

मुंबई: वांद्रे येथे अभिनवकुमार चौधरी (वय 26) या बिहारी सुरक्षारक्षकाची त्याच्याच परिचित मारेकऱ्याने चाकूने भोसकून हत्या केली. हत्येमागील कारण समजू शकले नाही. मारेकऱ्याची ओळख पटली असून अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
दरम्यान खेरवाडी पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. अभिनवकुमार हा एका खासगी कंपनीत सुरक्षारक्षक म्हणून कामाला होता. तो मूळचा बिहारच्या दरभंगाचा रहिवाशी आहेत.
सोमवारी दुपारी तो वांद्रे येथील खेरवाडी, म्हाडा कार्यालयासमोर होता. याच दरम्यान त्याचा परिचित आरोपी तिथे आला आणि त्याने त्याच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. काही कळण्यापूर्वीच त्याने चाकूने अभिनवकुमारवर वार केले. त्यात मानेला आणि हाताला गंभीर दुखापत झाली होती. त्याला जवळच्या भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले.
याप्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. परिसरातील सीसीटिव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून या फुटेजवरुन मारेकऱ्याची ओळख पटली आहे. तो सांताक्रुज येथील वाकोला परिसरात राहत असून त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. प्रेमप्रकरणातून किंवा पूर्ववैमनस्यातून ही हत्या झाली असावी असा कयास आहे.