ठाणे: कळव्यात कायदा धाब्यावर ठेवत अजूनही अनधिकृत चाळी आणि बेकायदा झोपड्या बांधण्याचे काम सुरूच असून याच वादातून भूमाफियांनी एकाच कुटुंबातील तिघांवर तसेच शेजारी असलेल्या एका महिलेवर धारदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना शुक्रवारी भीमनगर परिसरात घडली आहे.
यामध्ये एका महिलेच्या पोटात चाकू खुपसण्यात आला असून तिघांना गंभीर जखमी करण्यात आले आहे. जखमी असलेल्या चौघांनाही उपचारांसाठी पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल कारण्यात आले आहे.
हल्ला करणाऱ्या एकाला कळवा पोलिसांनी ताब्यात घेतले असून दोघे मात्र फरार आहेत. यासंदर्भात फरार झालेल्या आरोपींचा शोध कळवा पोलिसांनी सुरु केला आहे. दरम्यान हल्ला करणारे आणि जखमी दोघांकडूनही परस्पर तक्रार दाखल करण्यात आल्या आहेत.
कळव्यातील भीमनगर झोपडपट्टीत राहणाऱ्या सूरज विश्वकर्मा, सीतादेवी विश्वकर्मा, सोनाली विश्वकर्मा हे कुटुंब व त्यांचे शेजारी पूनम तिवारी पत्र्याच्या शेडच्या कच्च्या झोपडीत राहतात.
तीन वर्षांपूर्वी या परिसरात बेकायदा झोपड्या उभारणारा भूमाफिया जयप्रकाश बिंद यांनी या कुटुंबाला पक्के घर बांधून देण्याच्या बहाण्याने त्यांच्याकडून 5 लाख रुपये घेतले. मात्र काम न करता त्या जागेवर भाड्याने इतर व्यक्तींना ठेवण्यासाठी खोली खाली करण्यासाठी तगादा लावला होता.
जयप्रकाश बिंद व त्याची मुले राज बिंद व कृष्णा बिंद यांनी शुक्रवारी सकाळी आठच्या सुमारास घरात शिरून खोल्या खाली करण्यासाठी जीवे मारण्याची धमकी देत त्यांचावर धारधार चाकूने जीवघेणा हल्ला केला. तर यामध्ये शेजारच्या महिलेवरही हल्ला करण्यात आला. हल्ला केल्यावर आरोपी तेथून पळून गेले, शेजाऱ्यांच्या मदतीने जखमींना कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
यातील जखमी पूनम तिवारी (32) हिच्या पोटात चाकू खुपण्यात आली तर सोनाली विश्वकर्मा (24) हिच्या गळ्याजवळ गालावर चाकूचा वार करण्यात आला आहे. तर सुरज विश्वकर्मा (58) व सीतादेवी विश्वकर्मा (48)यांच्या पाठीवर व हातावर चाकूचे वार करण्यात आले आहेत. कळवा पोलिसांनी बिंद याच्यावर गुन्हा दाखल केला असून आरोपी राज बिंद याला ताब्यात घेतले असून दोघे आरोपी फरार झाले आहेत.
या वादातील मुख्य आरोपी जयप्रकाश बिंद यांच्यावर या आधी बेकायदा खोल्या बांधणे, जमीन हडप करणे व गुन्हेगारी पार्श्चेभूमीचे गुन्हे दाखल असून तो काहीकाळ पोलिसांनी त्याला तडीपार केले होते. कळवा पोलिस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले असून आरोपींनी गुरुवारी तिघा फिर्यादी महिलांनी पारसिक नगर येथील रिलायन्स मार्केट जवळ आरोपी बिंद यांना मारहाण केल्याची तक्रार कळवा पोलिसांत दाखल केली आहे. या संदर्भात कळवा पोलीस अधिक तपास करीत असून दोन्ही कुटुंबावर गुन्हा दाखल झाल्याची माहिती कळवा पोलीसांनी दिली आहे.