Jitendra Awhad on Reservation Controversy
ठाणे : आरक्षणाच्या विरोधात बोलणारे आणि आरक्षण काढून टाकण्याची भाषा करणारे हे आपले शत्रू आहेत, हे लक्षात ठेवा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस, आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी केले. जातीय मानसिकतेतून समाज जोपर्यंत बाहेर पडत नाही, तोपर्यंत स्वातंत्र्याचा खरा अर्थ सामान्य माणसाला समजणार नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
सिडको बसस्थानक येथील कोळी समाज सभागृहात विविध पक्षांतील सुमारे ३५० कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. यामध्ये बिपीन गेहलोत यांच्यासह सुमारे १६ महिला बचत गटांचा समावेश होता. जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी नव्या कार्यकर्त्यांचे स्वागत केले. यावेळी ठाणे महापालिका गटनेते अभिजीत पवार, विरू वाघमारे, मकसूद खान, फुलबानो पटेल आदी उपस्थित होते.
आव्हाड म्हणाले, भारत स्वतंत्र झाला असला तरी समाजाची मानसिकता अद्याप बदललेली नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती जाळून समता आणि समानतेचा संदेश दिला. महिलांना अधिकार आणि आरक्षण देण्याच्या दिशेने त्यांनी महत्त्वपूर्ण कार्य केले. आजही मागासवर्गीय समाजातील व्यक्तींना लक्ष्य केले जाणाऱ्या घटना घडत असतील, तर आरक्षणाची गरज आहे की नाही, याचा विचार समाजाने करावा.
संविधान न मानणाऱ्या आणि विषमतावादी विचारांना विरोध करणे हीच आपली भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले. “आमचा ब्राह्मण समाजाला विरोध नाही; मात्र मनुवादी विचारसरणीला आमचा कायम विरोध राहील,” असेही आव्हाड यांनी स्पष्ट केले.
जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी ठाणे शहरातील विकासकामांवरून सत्ताधाऱ्यांवर टीका केली. गेल्या ३५ वर्षांपासून सत्तेत असलेल्यांना शहराचा अपेक्षित विकास करता आला नसल्याचा आरोप त्यांनी केला. खारटन रोडच्या विकासाचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला.
‘वंदे मातरम्’च्या कडव्यांवरून सुरू झालेल्या वादात काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या कृतीचे आव्हाड यांनी समर्थन केले. काँग्रेसच्या काळात ‘वंदे मातरम्’च्या दोन कडव्यांना मान्यता देण्यात आली होती. त्यानुसारच सोनिया गांधी यांनी कार्यक्रमात भूमिका घेतल्याचे ते म्हणाले.