मुरबाड: सध्या गौरी गणपतीचा सण सुरू असून या सणात झेंडू फुलांना चांगली मागणी असते. दोन दिवसापूर्वी ओतूर आळेफाटा येथील शेतकऱ्यांनी कल्याण, वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी नेण्यात आलेली झेंडू फुलांची विक्री झाली नाही. त्यामुळे फुले शेतकऱ्यांवर फेकण्याची वेळ येऊन ठेपली. दरम्यान ऐन गणेशोत्सवात झेंडूच्या फुलांची मागणी घटल्याचे दिसून आले.
उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी या जुन्या म्हणीच्या विरुद्ध आजची परिस्थिती निर्माण झालेली असून उत्तम नोकरी, मध्यम व्यापार आणि दुय्यम शेती अशी गत शेती व्यवसायाची झालेली आहे. मात्र उद्योग क्षेत्राने आपले स्थान कायम ठेवलेले असून शेती व्यवसायाला घरघर लागल्याची भावना शेतकरी वर्गातून व्यक्त केली जात आहे.
ऐन गणेशोत्सवात शेतकऱ्यावर फुले रस्त्यावर फेकण्याची आलेली वेळ पाहता शेतकऱ्याला मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. झेंडूच्या फुलांना खरे तर उत्सव काळात मोठी मागणी दिसून येते. मात्र मोठ्या अपेक्षेने आलेल्या शेतकऱ्याला मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागल्याचे दिसून आले.
गाडी भाडे, हमाली थोडाफार नफा मिळाला तरी उत्सव काळात फुले विकण्याची शेतकऱ्यांची तयारी होती, मात्र ग्राहक मिळत नसल्याने नेलेल्या फुलांची वाहने माघारी आणून कल्याण नगर राष्ट्रीय महामार्गावर टोकावडे हद्दीत फेकून देण्यात आली.
या परिस्थितीस शेतकरी आणि शेती व्यवसायासाठी शासकीय धोरण अयोग्य असल्याचा फटका शेतकऱ्यांना बसत असल्याचा आरोप त्या फुल उत्पादक शेतकऱ्यांनी करून सणासुदीच्या सिझनमध्ये जर फुल विक्री होत नसेल तर जगायचं कसं असा सवाल उपस्थित होत आहे.
गौरी गणपतीचा सण असल्याने आम्ही झेंडू फुलांचे टेम्पो घेऊन कल्याण व वाशी मार्केटमध्ये गेलो होतो. भाव चांगला मिळेल, असे आम्हाला वाटले. परंतु एकही ग्राहक खरेदीसाठी आला नाही. शेवटी फुकट फुले देण्याचा निर्णय घेतला पण फुकट देखील घेण्यासाठी कोणी येत नव्हते. शेवटी फुलांचे टेम्पो माघारी घेऊन आलो.- फुल उत्पादक शेतकरी, ओतूर