अर्जुन चेमटे
वागळे: इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या तणावाचे पडसाद आता थेट सामान्य नागरिकांवर उमटताना दिसत आहेत. त्यातून निर्माण झालेल्या गॅस टंचाईची झळ ही हातावर पोट भरणाऱ्या कामगारांना लागली आहे. त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाल्याने कामगारांनी आपल्या गावाच्या दिशेने परतीचा प्रवास सुरू केला आहे.
ठाणे-मुंबईसारख्या शहरांमध्ये घरगुती तसेच व्यावसायिक गॅसचा तुटवडा प्रकर्षाने जाणवू लागला आहे. परिणामी हॉटेल्स व उपहारगृहांवर बंदची टांगती तलवार निर्माण झाली आहे.
गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासनाने घरगुती गॅस सिलिंडर बुकिंगचा कालावधी वाढवला असला तरी प्रत्यक्षात मात्र नागरिकांना वेळेवर गॅस उपलब्ध होत नसल्याने मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
ठाणे शहरात वाढत्या उष्णतेसोबतच गॅसच्या तुटवड्याची समस्या अधिकच तीव्र बनत आहे. याचा सर्वाधिक फटका हातावर पोट असलेल्या कामगारांना व छोट्या व्यावसायिकांना बसत आहे. स्वयंपाकासाठी आणि रोजीरोटीसाठी आवश्यक असणारा गॅस वेळेवर मिळत नसल्याने अनेकांनी तात्पुरते आपले मूळ गाव गाठण्याचा निर्णय घेतला आहे.
शहरातील विविध भागांमध्ये गॅस सिलिंडर मिळण्यात होणारा विलंब, वाढती मागणी आणि वितरण व्यवस्थेतील अडचणी यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.
गॅस पुरवठा सुरळीत करण्याची मागणी
चहा, वडापाव आणि हातगाड्यांवरील गॅसवर आधारित छोटे व्यवसाय ठप्प झाले असून आधीच उष्णतेमुळे विस्कळीत झालेल्या जनजीवनात या संकटाने आणखी भर घातली आहे. तरी प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून गॅस पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.