अंबरनाथ : पुढारी वृत्तसेवा
केमिकल कारखान्यातून सोडण्यात येणाऱ्या रासायनिक गॅसमुळे अंबरनाथ शहराच्या (Ambernath Gas leak) पूर्व भागातील बी केबिन परिसरात खळबळ उडाली आहे. यामुळे धुसर वातावरण झाले असून लोकांना डोळ्यात जळजळ आणि घसादुखीचा त्रास जाणवू लागला आहे. तसेच श्वास घेणेही अवघड होऊन बसले आहे.
अंबरनाथ शहर चारी बाजूंनी एमआयडीसीने वेढले आहे. त्यात केमिकल कारखाने राजरोसपणे प्रदूषण पसरवत असतानादेखील त्यावर प्रदूषण नियंत्रण मंडळ, स्थानिक स्वराज्य संस्था, पोलीस अशी कोणतीच शासकीय यंत्रणा कोणतेही ठोस पाऊल उचलताना दिसून येत नाहीत. त्यामुळे अशा प्रदूषण पसरवणाऱ्या केमिकल कारखान्यांचे चांगलेच फावले आहे.
गौरी-गणपती विसर्जनात भाविक दंग असताना शहराच्या पूर्व भागातील बी केबिन परिसरात मोठ्या प्रमाणत रासायनिक गॅस सोडण्यात आल्याचे समोर आले. या गॅसमुळे नागरिकांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला आहे. मोरीवली एमआयडीसी (MIDC) या परिसरापासून हाकेच्या अंतरावर असल्याने तेथूनच एखाद्या केमिकल कंपनीने रासायनिक गॅस सोडल्याची शक्यता वर्तवली जात आहे.