वाढदिवसाच्या पार्टीवरून मित्राचा खून करण्यात आला pudhari News Network
ठाणे

वाढदिवसाला दारू दिली नाही; मित्राचा चौथ्या मजल्यावरून फेकून खून

उल्हासनगर येथील घटना; तिघांना अटक

पुढारी वृत्तसेवा

उल्हासनगर : वाढदिवसाच्या पार्टीत दारु कमी पडल्याच्या रागातून उद्भवलेल्या भांडणाचा राग मनात धरून वाढदिवस असलेल्या मित्रालाच इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून फेकुन दिल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. ही धक्कादायक घटना उल्हासनगरमधील चिंचपाडा येथे घडली असून याप्रकरणी मंगळवारी (दि.२) तिघा मित्रांना विठ्ठलवाडी पोलिसांनी अटक केली.

मृत कार्तिक वायाळ हा चिंचपाडा गावच्या ग्रामपंचायत कार्यालयाजवळील आर्या अपार्टमेंटमध्ये चौथ्या माळ्यावर राहत होता. २७ जूनला कार्तिक वायाळ याचा वाढदिवस होता. कार्तिकच्या वाढदिवसाचा केक कापून झाल्यावर कार्तिक आणि त्याचा मित्र निलेश शिरसागर, सागर काळे आणि धीरज यादव हे कार्तिकच्या घरी आले. कार्तिकने मित्रांना वाढदिवसाची पार्टी दिली होती. या पार्टीत दारु देण्यावरुन कार्तिकचे मित्र निलेश बरोबर भांंडण झाले होते. त्यावेळी कार्तिक याने निलेशच्या डोक्यावर बिअरची बाटली फोडली. या भाडणांचा राग मनात धरुन निलेश क्षीरसागर, सागर काळे, धिरज यादव या तिघांनी संगनमत करुन कार्तिकला जबर मारहाण केली आणि चौथ्या मजल्यावरुन खाली फेकून दिले.

याप्रकरणी सुरुवातीला विठ्ठलवाडी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने सखोल तपास केला असता हत्या झाल्याचे उघड झाले. त्यामुळे कार्तिकचे वडील नामदेव वायाळ यांनी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात निलेश, सागर आणि धीरज यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. त्या आधारे चिंचपाडा भागातून तिघांना अटक केली. पुढील तपास विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक टी.एन.खळडे हे करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT