डोंबिवली: कल्याण-डोंबिवलीच्या शहर आणि ग्रामीण पट्ट्यात सार्वजनिक रस्त्यांसह हॉटेल्समध्ये निकृष्ट दर्जाचे, भेसळयुक्त, तसेच अस्वच्छ खाद्यपदार्थ सर्रास विकले जात असल्याचा गौप्यस्फोट करून शिवसेना नेत्या मनीषा धात्रक यांनी खळबळ उडवून दिली आहे.
खाद्य सुरक्षा धोक्यात आणणाऱ्या संबंधितांवर अन्न व औषध प्रशासनाने तातडीने कारवाया सुरू कराव्यात, या मागणीकडे त्यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांचे निवेदनाद्वारे लक्ष वेधले आहे.
अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यात ठिकठिकाणी धाडी टाकून भेसळयुक्त अन्नपदार्थांचे अड्डे उध्वस्त करण्याचा सपाटा लावला आहे. मुंढे यांच्या आक्रमक कारवायांमुळे गोरखधंदे करणाऱ्यांची पळता भुई थोडी झाली आहे.
मात्र याच तुकाराम मुंढेंच्या अन्न व औषध प्रशासनाने कल्याण-डोंबिवलीतील गैरप्रकारांकडे कानाडोळा केल्याने खाद्य भेसळ करणाऱ्या बदमाशांचे मनोधैर्य वाढत चालल्याचे दिसून येते. यावर माजी नगरसेविका तथा शिवसनेच्या नेत्या मनीषा धात्रक यांनी प्रकाशझोत टाकला आहे.
तरुणाईच्या फास्ट/जंक फूडवर उड्या
कल्याण-डोंबिवलीतील चौक, रस्ते फुटपाथ आणि सार्वजनिक ठिकाणी मानवी शरीरास धोकादायक ठरणाऱ्या आजीनोमोटोचा सर्रास वापर करून पनीर चिल्ली, सोया चिल्ली, मोमोज, चायनीज भेळ, शेजवान मंचुरियन सारखे फास्ट फूड मोठ्या प्रमाणावर विकले जातात.
यातील अनेक ठिकाणी अन्न सुरक्षेचे नियम, स्वच्छता, सुरक्षित पाणी आणि वैयक्तिक स्वच्छता पाळली जात नाही.
तसेच काही हॉटेल्समध्ये दूषित अन्नपदार्थ बनवले जात असल्याच्या तक्रारी खवय्यांकडून येत आहेत. विशेषतः १५ ते ३० वयोगटातील तरूण/तरूणी या फास्ट फूडचे मोठ्या प्रमाणावर सेवन करतात. त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे.
स्थानिक अधिकाऱ्यांची चौकशी आवश्यक
शिवसेना नेत्या मनीषा धात्रक यांनी ६ ठळक मागण्या केल्या आहेत. त्यात संपूर्ण शहरात विशेष तपासणी मोहीम राबवणे, पनीर-चीज-तेल-चटण्यांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणे, अन्नसुरक्षा कायद्यानुसार कठोर कारवाई करणे, परवाना नसलेल्या विक्रेत्यांवर कारवाई करणे आणि खाद्यपदार्थ हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी करणे, यांचा समावेश आहे.
तसेच कल्याण-डोंबिवलीमधील अन्नसुरक्षा अधिकाऱ्यांच्या कामकाजाची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.