डोंबिवली: मुंबई उपनगरीय रेल्वेच्या सर्वाधिक वर्दळीच्या स्थानकांपैकी एक असलेल्या कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात शनिवारी दुपारी तृतीयपंथीयांच्या दोन टोळक्यांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
या घटनेचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याने स्टेशन परिसरातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. प्रवाशांच्या डोळ्यांसमोर झालेल्या या हाणामारीमुळे काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.
स्टेशन परिसरातील सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची संख्या वाढवणे, २४ तास पोलिस गस्त आणि स्वतंत्र तक्रार निवारण कक्ष सुरू करणे, अशी मागणी प्रवासी संघटना आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. मात्र तोपर्यंत हाणामारीत सहभागी असलेले सर्वजण पसार झाले होते. व्हायरल व्हिडिओच्या आधारे संबंधितांची ओळख पटवून त्यांच्यावर कारवाई करण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.