टिटवाळा : लोणावळा येथील प्रसिद्ध एकविरा देवी मंदिरात होणाऱ्या वार्षिक जत्रेच्या पार्श्वभूमीवर टोलमाफीची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. 25 व 26 मार्च रोजी होणाऱ्या या धार्मिक सोहळ्यासाठी राज्यभरातून लाखो भाविक येण्याची शक्यता असून, त्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी संबंधित मार्गांवरील टोल माफ करण्याची मागणी करण्यात येत आहे.
टिटवाळा येथील सामाजिक कार्यकर्ते विजयभाऊ देशेकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे यासंदर्भात निवेदन सादर करत तातडीने निर्णय घेण्याचे आवाहन केले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही आगरी-कोळी समाजासह ठाणे, पालघर, रायगड, मुंबई उपनगर तसेच इतर भागांतून मोठ्या प्रमाणावर भाविक एकविरा देवीच्या दर्शनासाठी रवाना होतात. विशेषतः नवसपूर्तीच्या निमित्ताने कुटुंबासह प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी असते. बहुतांश भाविक खासगी वाहनांचा वापर करत असल्याने मुंबई-पुणे महामार्ग व इतर जोडमार्गांवरील टोल नाक्यांवर वाहनांची गर्दी वाढते.
या वाढत्या गर्दीमुळे केवळ वाहतूक कोंडीच नव्हे, तर प्रवास खर्चातही लक्षणीय वाढ होते. सध्याच्या परिस्थितीत इंधनदर आणि टोल दर यामुळे सामान्य भक्तांच्या खिशावर ताण येत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे धार्मिक श्रद्धेच्या या मोठ्या उत्सवात शासनाने पुढाकार घेत टोलमाफीचा निर्णय घ्यावा, अशी भावना भाविकांमधून व्यक्त होत आहे.
यासंदर्भात विजयभाऊ देशेकर यांनी उपमुख्यमंत्री यांनाही लेखी निवेदन देत शासनाने सकारात्मक आणि सहानुभूतीपूर्वक विचार करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. “धार्मिक उत्सवाच्या काळात नागरिकांना दिलासा देणे ही शासनाची सामाजिक जबाबदारी आहे,” असे त्यांनी नमूद केले.
मूलभूत सुविधांची तयारी सुरू जत्रेच्या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासनाने वाहतूक नियंत्रण, सुरक्षा व्यवस्था आणि मूलभूत सुविधांची तयारी सुरू केली आहे. टोलमाफीचा निर्णय झाल्यास भाविकांचा प्रवास अधिक सुलभ होऊन जत्रा निर्विघ्न पार पडण्यास मोठी मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.