Eknath Shinde  Pudhari
ठाणे

Deputy CM Eknath Shinde | ठाणे जिल्ह्याच्या विकासाला मिळणार नवी गती

Deputy CM Eknath Shinde | ज्येष्ठ नागरिकांसाठी 'आधारवड' ॲप अन् जनतेसाठी 'पोलिस मित्र'; ठाण्यात नवनवीन डिजिटल उपक्रम!

पुढारी वृत्तसेवा

ठाणे : पुढारी वृत्तसेवा

८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकवण्यात आला. यावेळी स्वातंत्र्यसैनिक, शहीद जवानांचे कुटुंबीय, लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि नागरिकांच्या उपस्थितीत त्यांनी विकसित भारत २०४७, महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास, शेतकरी कल्याण, गृहनिर्माण, पायाभूत सुविधा आणि ठाणे जिल्ह्याच्या परिवर्तनाचा व्यापक आढावा मांडला.

यावेळी बोलताना, ड्रोन, क्षेपणास्त्रांचे, सुपरसॉनिक क्रूझ मिसाइल, आधुनिक युद्धनौका आणि इलेक्ट्रॉनिक संरक्षण प्रणालींमुळे भारताची संरक्षण क्षमता मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. 'मेक इन इंडिया' आणि 'आत्मनिर्भर भारत' या उपक्रमांमुळे देश आता संरक्षण उत्पादनातही जगासमोर सक्षम राष्ट्र म्हणून उभा राहत असल्याचे त्यांनी सांगितले.

देशातील नक्षलवाद मोठ्या प्रमाणावर नियंत्रणात आला असून अनेक नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण करून मुख्य प्रवाहात प्रवेश केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली शांतता, सुरक्षा आणि विकास या त्रिसूत्रीमुळे देशाच्या दुर्गम भागातही विकासाची नवी पहाट उगवली असल्याचे सांगितले.

राज्याच्या तिजोरीवर पहिला हक्क बळीराजाचा असल्याचे सांगत शिंदे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना २०२६ लागू करून निवडणुकीतील आश्वासन पूर्ण केल्याचे सांगितले. शेतकऱ्यांना आधुनिक शेतीसाठी सिंचन, सुधारित अवजारे, कृषी तंत्रज्ञान आणि विविध योजनांचा लाभ देण्यात येत असून ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करण्यावर सरकारचा विशेष भर असल्याचे त्यांनी नमूद केले.

नवीन गृहनिर्माण धोरणाद्वारे गरीब व मध्यमवर्गियांना परवडणारी पक्की घरे उपलब्ध करून देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र झोपडपट्टीमुक्त करण्याचे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे.

पुनर्विकासात अधिकृत अथवा अनाधिकृत रहिवाशांवर अन्याय होणार नाही; प्रत्येकाला न्याय, हक्क आणि सन्मानाने घर मिळेल, अशी ग्वाही त्यांनी दिली. कृषी व्हिलगीकरण योजनेअंतर्गत हजारो शेतकऱ्यांना लाभ मिळाला असून ॲग्री-स्टॅक प्रणालीवर १७ हजारांहून अधिक शेतकऱ्यांची नोंदणी पूर्ण झाली आहे. काही महिन्यांपूर्वी ठाणे जिल्हा परिषद शाळेतील १५ विद्यार्थ्यांना इस्रो भेटीची संधी मिळाली. ग्रामीण भागातील विद्यार्थी उद्याचे शास्त्रज्ञ बनू शकतात, हा विश्वास या उपक्रमातून अधिक दृढ झाला असल्याचे शिंदे म्हणाले.

ठाणे शहरात ६,०५९ एआय आधारित सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण ठेवले जात आहे. ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी 'आधारवड' ॲप, तर पोलिस व जनतेतील दरी कमी करण्यासाठी 'पोलिस मित्र' सुरू करण्यात आले आहे.

सायबर गुन्ह्यांविरोधात व्यापक जनजागृती मोहीम राबविण्यात येत असून डिजिटल युगात नागरिकांचे संरक्षण हे सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी ठाणे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, ठाणे मनपा आयुक्त सौरभ राव, ठाणे पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे, खासदार नरेश म्हस्के, आमदार संजय केळकर, महापौर शर्मिला पिंपळोळकर, उपमहापौर कृष्णा पाटील, सभागृह नेते हनुमंत जगदाळे आणि सर्व प्रमुख अधिकारी, कर्मचारी आणि पोलिस तसेच सर्वसामान्य ठाणेकर नागरिक उपस्थित होते.

नवे प्रकल्प ठाण्याचे भवितव्य बदलतील

  • विशेष निधी अभियान : राज्यातील नगरपालिका आणि महानगरपालिकांच्या सर्वांगीण विकासासाठी ४४ कोटी रुपयांचे विशेष निधी अभियान सुरू करण्यात आले आहे.

  • पायाभूत सुविधा व रस्ते प्रकल्प : ठाणे शहरात अंतर्गत मेट्रो, ठाणे–बोरीवली बोगदा, घोडबंदर मार्ग, वाहतूक सुधारणा, पुनर्विकास, ओपन स्पेस आणि नागरिकांना विश्वासात घेऊन राबविले जाणारे प्रकल्प ठाण्याचे भवितव्य बदलतील.

  • न्यायाची ग्वाही : कोणत्याही नागरिकावर अन्याय होऊ दिला जाणार नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT