ठाणे : महाराष्ट्राच्या राजकारणात ठाणे आणि नवी मुंबईतील सत्तासमीकरणे नेहमीच चर्चेचा विषय राहिली आहेत. विशेषतः एकनाथ शिंदे यांनी ठाण्याची कमान हाती घेतल्यापासून गणेश नाईक आणि शिंदे यांच्यात सुप्त संघर्ष सुरू झाला. नाईक मंत्री झाल्यानंतर त्यांनी सुरू केलेल्या जनता दरबारांनी या संघर्षाला व्यापक वळण मिळाले. मात्र, अचानक या दोन्ही नेत्यांनी मंत्रालयात बंद दाराआड चर्चा केल्याने आपसातील वाद संपुष्ठात येऊन त्यांचे मनोमिलन झाले की काय, अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत.
एकीकडे ठाकरे बंधूंचे मनोमिलन झाल्यानंतर दुसरीकडे आता एकनाथ शिंदे आणि त्यांचे कट्टर विरोधक गणेश नाईक यांच्यामध्येही मनोमिलन होणार का याचीही चर्चा सुरु झाली. नवी मुंबई हा गणेश नाईक यांचा बालेकिल्ला मानला जातो. तीन दशकांहून अधिक काळ त्यांनी येथे आपली राजकीय पकड मजबूत ठेवली आहे. दुसरीकडे, एकनाथ शिंदे यांनी गेल्या काही वर्षांत ठाण्यापलिकडे जात नवी मुंबईतही संघटनात्मक जाळे विणण्याचा प्रयत्न सुरू केल्याने या दोन्ही नेत्यांमध्ये संर्घष सुरू झाला.
प्रभाग रचना, विकासकामे, नगरसेवक फोडणे अशा अनेक मुद्द्यांवरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. मंत्री झाल्यानंतर गणेश नाईक यांनी ठाण्यामध्ये जनता दरबार सुरू केला. त्यानंतर त्यांच्यावर शिंदे गटाकडून चांगलीच टीका सुरू झाली. नवी मुंबई महापालिकेत भाजपने स्वतंत्र लढण्याची भूमिका घेतल्याचं गणेश नाईकांनी अनेकदा अप्रत्यक्षपणे सांगितले. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर हा वाद तीव्र झाला होता. अशात शिंदे आणि नाईक यांच्यात मंत्रालयात बंददाराआड 15 मिनिटांहून अधिक काळ चर्चा झाल्याने, ही भेट राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जात आहे.
नवी मुंबई पालिकेची निवडणूक भाजप आणि शिवसेनेने महायुती म्हणून लढवावी, यावर दोन्ही नेत्यांचे बैठकीत एकमत झाल्याचे कळते.जागावाटपाचा फॉर्म्युला देखील अंतिम झाला असून, ठाणे, पालघरमधील अन्य पालिकांबाबतही या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ठाकरे बंधू एकत्र आल्याने युतीचे नवे समीकरण
मुंबईसह नवी मुंबई, ठाणे आणि इतर ठिकाणी आता ठाकरे बंधू एकत्र आले आहेत. त्यामुळे महायुतीसमोरचे आव्हान वाढल्याचे चित्र आहे. नेमकी हीच परिस्थिती लक्षात घेऊन महायुतीने आता सावधपणे पावले टाकायला सुरूवात केल्याचे दिसतेय. त्याचाच एक भाग म्हणून एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक यांच्या या भेटीकडे पाहिले जात आहे.