डोंबिवली: डोंबिवली शहराच्या पूर्व-पश्चिम भागात उपप्रादेशिक परिवहन विभाग आणि डोंबिवली वाहतूक नियंत्रण शाखेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी एकत्रितपणे वाहन तपासणी मोहीम राबविली. या कारवाईत ८० हून अधिक रिक्षा, दुचाकी, चारचाकी आणि इतर वाहनांवर एकूण ६२ हजार रुपयांची ई-चलान पद्धतीने दंडात्मक कारवाई करण्यात आली.
बहुतांशी रिक्षाचालक गणवेश परिधान न करता, रिक्षा वाहनतळावर न थांबता रेल्वे स्थानक भागातील रस्ते, चौक, रेल्वेच्या प्रवेशद्वावर थांबून प्रवासी वाहतूक करतात. हे सर्व रिक्षावाले उपप्रादेशिक परिवहन अधिकारी व डोंबिवली शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या तावडीत सापडले. यामधील एकालाही पळून जाण्याची संधी न देता अधिकाऱ्यांनी या रिक्षा चालकांवर दंडात्मक कारवाई केली.
कल्याणचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आशुतोष बारकुल, डोंबिवली शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय अहिरे, पोलीस उपनिरीक्षक कैलास घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली मोटार वाहन निरीक्षक आमते, मोटार वाहन निरीक्षक मांजरे, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक भुसे, चालक आव्हाड यांच्या पथकाने ही कारवाई केली.
पूर्व भागातील इंदिरा चौक, बाजीप्रभू चौक, रामनगर रिक्षास्टँड, पाटकर रोड, डाॅ. राॅथ रोड भागात रस्ते अडवून, स्टँड सोडून उभ्या असलेल्या रिक्षावाल्यांवर कारवाई केली. अनेक रिक्षावाले गणवेशात नव्हते.
अशा रिक्षावाल्यांना २ हजारांपासून ५ हजार पर्यंत दंड ठोठावले. आरटीओ, वाहतूक नियंत्रण शाखेची कारवाई सुरू झाल्याचे समजताच कागदपत्रेे, गणवेशात नसलेले रिक्षावाले स्टँड, रेल्वे स्थानक भागातून पळून जाऊ लागले. मात्र कारवाई पथकाने रोखून त्यांच्यावर ई-चलान पद्धतीने कारवाई केली.
या कारवाईनंतर पथकाने पश्चिम डोंबिवलीत जाऊन महात्मा फुले रोड, पंडित दिनदयाळ चौक, सुभाष चौक, कोपर उड्डाण पूल भागात अचानक तपासणी मोहीम राबविली. या कारवाईच्यावेळी अनेक रिक्षावाले आणि दुचाकीस्वार कारवाईच्या फेऱ्यात अडकले. काही वाहन चालकांची तपासणी करण्यात आली.
काही जणांकडे वाहनाची आवश्यक कागदपत्रे जवळ नसल्याने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. वाहन सक्षमता प्रमाणपत्र जवळ नसणे, मुदत संपलेले प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र आणि त्याचे नूतनीकरण केलेले नसणे, अनेक चालक गणवेशात नव्हते. काही जणांकडे बॅज, लायसन्स आणि परमिट नसल्याचे पथकाला तपासणीत आढळले.
कारवाई सुरू झाल्याचे कळताच अनेक रिक्षावाले बेपत्ता झाले होते. त्यामुळे रस्त्यांवर शुकशुकाट होता. आक्रमक कारवाईच्या बडग्यामुळे स्टँडवरील रिक्षा चालकांचीही धाकधूक वाढली होती.