डोंबिवली : पाच वर्षांनंतर डोंबिवली एमआयडीसीच्या फेज दोन परिसरातील रस्ता चक्क गुलाबी रंगाचा पहायला मिळाला आहे. गुलाबी थंडीप्रमाणे रस्त्याचा रंगही गुलाबी झाला असला तरी ही बाब आनंदादायी नसून चिंता वाढवणारी आहे. परिणामी डोंबिवलीत पुन्हा एकदा प्रदूषणाचा मुद्दा या निमित्ताने उपस्थित झाला आहे.
फेज १ आणि २ मध्ये असलेल्या केमिकल कंपन्यांच्या प्रदूषणामुळे नेहमीच चर्चेत असणाऱ्या डोंबिवलीत शनिवारी चक्क गुलाबी रस्ता पहायला मिळाला. डोंबिवली एमआयडीसीत केमिकल कंपन्या असून या कंपन्यांमुळे डोंबिवलीकरांना नेहमीच प्रदूषणाचा त्रास सहन करावा लागत असतो. यापूर्वी डोंबिवलीत हिरवा पाऊस, ऑरेंज ऑईल मिश्रित पाऊस, काळा पाऊस पडला होता. पाच वर्षांपूर्वी केमिकलच्या प्रादुर्भावामुळे एमआयडीसी संपूर्ण रस्ता गुलाबी रंगाचा झाला होता. त्याची पुनरावृत्ती शनिवारी झाल्याचे पहायला मिळाले. या रस्त्याचे विदारक दृश्य जागरूक रहिवासी राजू नलावडे यांनी समाज माध्यमांवर व्हायरल करून प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर आणला आहे.
रस्त्यावर गुलाबी रंग आला कुठून ?
रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या गटारांमध्ये केमिकल असल्याचे आढळून आले. या केमिकलच्या प्रादुर्भावामुळे रस्त्याला गुलाबी रंगाचा मुलामा आला आणि दर्प सुटल्याचे स्थानिक रहिवाशांनी सांगितले. २०२० सालात अशाच गुलाबी रस्त्याचा विषय समोर आला होता. राज्याचे तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या घटनेची दखल घेतली होती. ५ वर्षानंतर पुन्हा हा विषय पुढे आला आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी या घटनेची गांभीर्याने दखल घेतील का ? असा सवाल परिसरातील रहिवाशांकडून विचारण्यात येत आहे. अशा प्रकारच्या बदलामुळे परिसरातील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. काही वर्षांपूर्वी डोंबिवलीत हिरवा पाऊस तर ऑरेंज ऑईल मिश्रित पाऊस पडला होता. आता तर थेट रस्त्यावर गुलाबी रंगाचा थर पहायला मिळत आहे. या प्रकारामुळे परिसरातील रहिवाशांमध्ये भितीसह चिंता व्यक्त करण्यात येत आहे. या गंभीर समस्येवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी रहिवाशांकडून करण्यात येत आहे.
नक्की काय आहे हा प्रकार ?
डोंबिवली एमआयडीसीत अनेक रासायनिक कंपन्या असून यामुळे डोंबिवलीकरांना नेहमीच प्रदूषणाचा त्रास सहन करावा लागतो. यापूर्वी काही वर्षांपूर्वी डोंबिवलीत हिरवा पाऊस, ऑरेंज ऑईल मिश्रित पाऊस पडला होता.तर आता केमिकलमुळे एमआयडीसी सम्पर्ण रस्ता गुलाबी रंगाचा झाला आहे. रस्त्याच्या बाजूला असलेल्या मोठ्या प्रमाणात गटारात केमिकल असल्याचे ही दिसून आले आहे.
सरकारे बदलली...समस्या मात्र जैसे थे
या भागातील केमिकल कंपन्यांकडून सुरक्षिततेची उपाय योजना केल्या जाणार नसतील, तसेच सुरक्षा आणि प्रदूषण नियंत्रणाचे निमया पळले जात नसतील तर अशा कंपन्यांना टाळे ठोकण्याचा इशारा तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २०२० मध्ये दिला होता. त्यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळ, एमआयडीसी, औद्योगिक सुरक्षा विभाग, अग्नीशमन दलाने संयुक्त सर्वेक्षण करुन १०७ कंपन्यांचे सर्वेक्षण केले. त्यापैकी ३८ कंपन्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या सर्वेक्षणापश्चात काही कंपन्या स्थलांतरीत करण्याचा प्रस्ताव आला. दरम्यान महाविकास आघाडीचे सरकार बदलले. त्यानंतर महायुतीचे सरकार आले. महायुतीच्या सरकारने कंपन्या स्थलांतराचा विषयावर पुनर्विचार करण्याचे भाष्य केले होते. त्यानंत पुढे काहीच कार्यवाही झाली नाही. परिणामी प्रदूषणाचा प्रश्न काही अद्याप सुटलेला नाही. त्याची पुन्हा एकता प्रचिती रस्ता गुलाबी झाल्यानंतर आली आहे.