Tree Felling Kalyan
डोंबिवली : कल्याण पूर्वेतील जॉली टेलर ते जुनी जनता बँक दरम्यानच्या नियमबाह्य पद्धतीने बांधण्यात आलेल्या नवीन रस्ता बांधकामादरम्यान वृक्ष तोड करण्यात आली आहे. एकीकडे या प्रकारामुळे परिसरातील वृक्षवल्ली धोक्याच्या उंबरठ्यावर आहे. तर दुसरीकडे नियबाह्य पद्धतीने केलेल्या वृक्ष तोडीवरून वाद उफाळला आहे. प्रशासनाच्या परवानग्यांचा गैरफायदा घेऊन वृक्षवल्लीच्या मुळावर उठलेल्या संबंधितांवर कठोर कारवाईचा बडगा उगारण्याची मागणी निसर्गप्रेमी पर्यावरणवाद्यांकडून पुढे आली आहे.
या संदर्भात प्राप्त माहितीनुसार, या रस्त्यावरील काही झाडे तोडण्याची परवानगी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेकडून संबंधित विकासकाला देण्यात आली होती. मात्र परवानगी मिळाल्यानंतर झाडे तोडण्यापूर्वी नागरिकांच्या माहितीकरिता संबंधित झाडांवर नोटीस चिटकविणे, तसेच जाहीर नोटीस प्रसिद्ध करणे कायदेशीरदृष्ट्या आवश्यक असताना ही प्रक्रिया पूर्ण न करताच थेट सरसकट वृक्षतोड करण्यात आल्याचे उघड झाले आहे. याशिवाय परवानगी नसलेल्या झाडांचीही अनधिकृतपणे तोड करण्यात आल्याची स्थानिक निसर्गप्रेमी पर्यावरणवाद्यांकडून तक्रार पुढे आली आहे. पर्यावरणीय नियमांचा भंग झाल्याचा आरोप शिवसेना (उबाठा) पक्षाच्या वतीने सद्या सुरू असलेल्या उपोषणा दरम्यान करण्यात येत आहे.
या प्रकरणी वनरक्षक तज्ज्ञांच्या मते, संबंधितांवर महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) वृक्ष संरक्षण व संवर्धन अधिनियम, १९७५ अंतर्गत कारवाई होऊ शकते. या कायद्यानुसार, परवानगीशिवाय वृक्षतोड करणे, तसेच परवानगीच्या अटींचे उल्लंघन करणे हा दंडनीय गुन्हा आहे. दोषींवर दंड आकारण्यासोबतच आवश्यक असल्यास फौजदारी गुन्हाही दाखल होऊ शकतो. तसेच महापालिकेच्या नियमांनुसार वृक्षतोडीपूर्वी सार्वजनिक नोटीस देणे बंधनकारक असून त्याचे पालन न केल्यास संबंधित अधिकाऱ्यांसह विकासकावर शिस्तभंगाची कारवाई करण्याची तरतूद आहे.
या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून नियमभंग करणाऱ्यांवर तात्काळ आणि कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी स्थानिक रहिवाशांसह उपोषणकर्त्यांकडून करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाचे अधिकारी संजय जाधव यांना उपोषणकर्त्यांनी अनधिकृतपणे तोडलेली झाडे दाखवली. या प्रकाराची गंभीर दखल घेतल्यानंतर अधिकाऱ्यांनी तोडलेल्या झाडांच्या प्रत्यक्ष जागेवर जाऊन पहाणी करून पंचासमक्ष पंचनामा केला असून संबंधीतांवर गुन्हा दाखल करण्याबाबतची प्रक्रिया सुरू केल्याचे सांगण्यात येत आहे.
विशेष म्हणजे याच परिसरातील जागांवरील अस्तित्वात असलेल्या झाडांचा महानगरपालिका स्तरावर सन २०१७ साली सर्व्हे करण्यात आला होता. त्यावेळी या परिसरात विविध प्रकारची ३१ झाडे अस्तित्वात होती. त्यापैकी आता फक्त २ झाडेच शिल्लक असल्याची धक्कादायक बाब माहितीच्या अधिकारात प्राप्त झाल्याचे उबाठाचे जिल्हाप्रमुख शरद पाटील यांनी या संदर्भात बोलताना सांगितले. या सर्व गंभीर परिस्थितीची वास्तवता लक्षात घेता आता कल्याण-डोंबिवली महानगरपालिका प्रशासन कोणती ठोस पावले उचलते ? याकडे उपोषणकर्ते आणि निसर्गप्रेमी पर्यावरणवाद्यांसह सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.