Dombivali Crime News Pudhari
ठाणे

Dombivali Crime: धक्का लागल्याच्या कारणावरून डोंबिवलीत केली तरुणाची हत्या, नाशिकला लपले; शेवटी जाळ्यात अडकलेच, 6 जणांना अटक

धक्क्यामुळे झाला रक्तरंजित खून! डोंबिवलीतील थरार २४ तासांत उलगडला; सहा आरोपी नाशिकमधून जेरबंद

पुढारी वृत्तसेवा

डोंबिवली: डोंबिवली एमआयडीसीतील एका बारजवळील खुनाचा पोलिसांनी 24 तासांत छडा लावला आहे. याप्रकरणी पोलिसांनी नाशिकमधील 6 आरोपींना अटक केली असून अमर राजेश महाजन (३६, रा. महाजन चाळ, कर्वे रोड, विष्णूनगर, डोंबिवली-पश्चिम), अक्षयकुमार शंकर वागळे (२६, धनलक्ष्मी एकविरा अपार्टमेन्ट, दावडी-रिजन्सी रोड, डोंबिवली-पूर्व), अतुल बाळू कांबळे (२४, रेणुका चाळ, सरोवर नगर, कुंभारखाणपाडा, सुभाष रोड, डोंबिवली-पश्चिम), निलेश मधुकर ठोसर (४२, शुभ सुष्टी अपार्टमेंट आंबेडकर चौक, बदलापूर-पूर्व), प्रतिकसिंग प्रेमसिंग चौहान (२६, रा. विठ्ठल प्रसाद बिल्डींग, आयरे रोड, डोंबिवली-पूर्व) आणि लोकेश नितीन चौधरी (२४, रा. साई चरण निवास चाळ, सरोवर नगर, डोंबिवली-पश्चिम अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

एमआयडीसीच्या फेज 2 भागातील मालवण किनारा या बार अँड रेस्टॉरंटच्या एन्ट्री गेटवर धक्का लागल्याच्या कारणातून ग्राहकाचा हिंसक टोळक्याने चाकूने सपासप वार करून खून केला होता. ही घटना रविवारी ९ नोव्हेंबर रोजी रात्री सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास घडली होती. सहा जणांच्या टोळक्याने केलेल्या जीवघेण्या हल्ल्यात गोग्रासवाडीतील सरोवर बार जवळ असलेल्या सुरेश पाटील इमारतीत राहणारा आकाश भानू सिंग (३८) हा जागीच ठार झाला. नवीमुंबाईतील एका कॉल सेंटरमध्ये नोकरी करणारा दुर्दैवी आकाशचा धाकटा भाऊ बादल सिंग याने या संदर्भात दिलेल्या फिर्यादीनुसार मानपाडा पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदवून तपास चक्रांना वेग दिला होता.

असा घडला रक्तरंजित थरारक

आकाश सिंग आणि त्याचे मित्र मालवण किनारा येथे जेवण करण्यासाठी गेले होते. हॉटेलमध्ये प्रवेश करताना आकाशचा अक्षय वागळेला धक्का लागला. धक्का मारल्याच्या गैरसमजातून त्या अक्षयने आकाशला शिवीगाळ/मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. चुकून धक्का लागला, असं आकाश आणि त्याचे मित्र समजावून सांगत होते. पण अक्षय काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्याने फोन करून आपल्या मित्रांना हॉटेल मालवण किनारा येथे बोलावून घेतले.

यानंतर अक्षय आणि त्याच्या साथीदारांनी आकाश सिंगला हॉटेलमधून फरफटत रस्त्यावर आणले. तेथे बेदम मारहाण केल्यानंतर चाकूने वार करून त्याला ठार केले. आकाशच्या बचावासाठी कुणीही पुढे आले नाही. सुनील कागले यांनी धाडस करून आकाश सिंगच्या बचावासाठी प्रयत्न केला. मात्र टोळक्याने सुनील यांच्या गालावर चाकूने वार करून त्यांनाही जखमी केले. मानपाडा पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर तपास सुरू केला.

खुन्यांना पकडण्याचे आव्हान

घटनास्थळी कोणताही मागमूस नव्हता. त्यामुळे खुन्यांना पकडण्याचे पोलिसांपुढे कडवे आव्हान उभे होते. पोलीस उपायुक्त अतुल झेंडे, डोंबिवली विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुहास हेमाडे आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदिपान शिंदे यांनी आपल्या प्रदीर्घ अनुभवाचा कस पणाला लावला. त्यासाठी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलिस निरीक्षक जयपालसिंह राजपूत, पोलिस निरीक्षक लक्ष्मण साबळे, पोलिस निरीक्षक मनिषा वर्पे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक संपत फडोळ, महेश राळेभात, सागर चव्हाण, सपोउनि सुनिल पवार, हवा. संजू मासाळ, शिरीष पाटील, राजकुमार खिलारे, विकास माळी यांच्या पथकाने तपास केला.

नाशिकच्या गल्ली-बोळांत थरारक पाठलाग

तांत्रिक विश्लेषण आणि खबरींकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे मानपाडा पोलिसांच्या पथकाने नाशिक गाठले. एका ठिकाणी सहा जणांची टोळी लपून बसली होती. पोलीस आल्याची कुणकुण लागताच या टोळक्याने तेथून धूम ठोकली. गल्ली-बोळांमध्ये आरोपींच्या मागे पोलीस असा थरार सुरू होता. नाशिक शहर पोलिसांच्या मदतीने फिल्मी स्टाईलने थरारक पाठलाग करून या सहाही जणांना बेड्या ठोकल्या.

डोंबिवलीत आणल्यानंतर या टोळक्याने आकाश सिंग याच्या खुनाची काबूल दिली. घटना घडल्यापासून अवघ्या २४ तासांच्या आत सहाही खुन्यांना हुडकून काढणाऱ्या पथकाचे जिल्ह्याचे शहर पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कौतुक केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT