डोंबिवली : प्रामाणिकपणे प्रवाशांचे विसरलेले सामान परत करणाऱ्या रिक्षाचालकांच्या घटना आपण नेहमी ऐकतो. मात्र, याच्या अगदी उलट डोंबिवलीत एक रिक्षाचालक दागिने असलेली प्रवासी महिलेची बॅग घेऊन पसार झाल्याची घटना समोर आली आहे. बालीका बाळकृष्ण गवस या प्रवासी महिलेची सोन्याचे मंगळसूत्र असलेली बॅग रिक्षातच राहिली आणि रिक्षाचालकाने प्रामाणिकपणा न दाखवता ती लांबवली. या गंभीर घटनेची तक्रार दाखल होताच कल्याण क्राईम ब्रँचच्या युनिटने अवघ्या २४ तासांत रिक्षाचालकाला अटक करून चोरीला गेलेला सर्व ऐवज हस्तगत केला आहे.
मूळच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या बालीका बाळकृष्ण गवस (वय 56) या दिवाळी सणानिमित्त 30 ऑक्टोबर रोजी आपल्या कल्याण-शिळ महामार्गावरील टाटा पॉवर येथे राहणाऱ्या आणि डोंबिवली पूर्वेकडील मानपाडा रोडवरील स्टार कॉलनीतील अशा दोन्ही मुलींकडे आल्या होत्या. यावेळी त्यांनी दिवाळीचा फराळदेखील सोबत घेतला होता. 31 ऑक्टोबर रोजी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास त्या स्टार कॉलनीतील मुलीला भेटून टाटा पॉवर येथील दुसऱ्या मुलीकडे जाण्यासाठी रिक्षाने निघाल्या होत्या. यावेळी प्रवासादरम्यान सुरक्षिततेसाठी त्यांनी आपले 30 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र बॅगेत ठेवले होते.
बालीका गवस या पिसवलीतील पिंगारा बारसमोर रिक्षातून उतरल्या आणि रिक्षावाल्याला भाडे देऊन मुलीची वाट बघत थांबल्या. काही वेळाने त्यांचे लक्ष गेले असता रिक्षामध्ये ठेवलेल्या दोन बॅगा विसरल्याचे त्यांच्या लक्षात आले. तोपर्यंत रिक्षावाला पसार झाला होता. भयभीत झालेल्या बालीका गवस यांनी तातडीने तिथे आलेल्या मुलीला सर्व प्रकार सांगितला. माय-लेकींनी रिक्षावाल्याचा सर्वत्र शोध घेतला, परंतु तो कुठेही सापडला नाही. अखेर बालीका गवस आणि त्यांचे जावई योगेश सावंत यांनी क्राईम ब्रँचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित शिंदे यांची भेट घेऊन हा प्रकार त्यांच्या कानावर टाकला.
या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वपोनि अजित शिंदे यांनी सहायक पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील, बळवंत भराडे, उपनिरीक्षक किरण भिसे यांच्यासह एक विशेष पथक तातडीने रिक्षाचालकाचा शोध घेण्यासाठी रवाना केले. या पथकाने रात्रंदिवस तांत्रिक विश्लेषण (Technical Analysis) आणि शोध मोहीम राबवून अवघ्या 24 तासांत जयेश वसंत गौतम (वय 32, रा. टिटवाळा) या रिक्षाचालकाला हुडकून काढले. रिक्षाचालकाने सोन्याचा ऐवज लपवून ठेवल्यामुळे त्याला तत्काळ अटक करण्यात आली.
क्राईम ब्रँचच्या पथकाने जयेश गौतम याच्याकडून चोरीस गेलेले 3 लाख 60 हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र आणि गुन्ह्यात वापरलेली रिक्षा असा एकूण 5 लाख 21 हजार 550 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. रिक्षाचालकाला पुढील कारवाईसाठी मानपाडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. कोणताही ठोस 'क्लू' नसतानाही चोरीस गेलेले मंगळसूत्र परत मिळवून दिल्याबद्दल प्रवासी महिला बालीका गवस आणि त्यांच्या कुटुंबियांनी कल्याण क्राईम ब्रँचच्या पथकाचे जाहीर कौतुक केले आहे.