मुरबाड शहर : किशोर गायकवाड
मुरबाड नगरपंचायतीच्या प्रभाग क्र. 2 मधील डोहळे पाडा परिसर पाणीटंचाई आणि मुबलक वीज पुरवठ्याअभावी हैराण झाला आहे. सुमारे दोनशेहून अधिक घरांची लोकवस्ती असलेला डोहळे पाडा नगरपंचायत हद्दीत असूनही परिस्थिती मात्र एखाद्या दुर्लक्षित दुर्गम वाडीपेक्षाही बिकट असल्याचे चित्र आहे.
ना मुबलक पाणी, ना व्यवस्थित वीज, असे चित्र येथे दिसून येत आहे. पाणीटंचाईमुळे नागरिकांच्या घशाला अक्षरशः कोरड पडली आहे. नळाला येणारे पाणी तुटपुंजे असून अनेकदा पाणी येण्याची वेळच ठरलेली नसल्याने नागरिकांना रात्रभर जागून पाण्याची वाट पाहावी लागते. “पुढच्या वर्षी नवीन टाकी देऊ” अशी थातूरमातूर घोषणा करून नगरपंचायत स्वतःची जबाबदारी झटकत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.
येथून जवळपास तीन किलोमीटर अंतरावरील मुरबाडी नदीच्या पात्रावर महिला वर्गाला भर उन्हात धुणीभांड्यांसाठी पायपीट करावी लागते. मात्र आता ते नदीचे पात्रही आटल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे. परिणामी, नाईलाजाने नागरिकांना पाणी टँकर विकत घ्यावे लागत असून रोजच्या रोज खिशाला आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.
कोट्यवधींच्या पाणीपुरवठा योजनांचा गवगवा आणि तहानलेले नागरिक, हा विरोधाभास समोर आला विद्युत खांब जीर्ण असून धोकादायक अवस्थेत उभे आहेत. यामुळे अपघाताची भीती व्यक्त होत आहे.
ग्रामस्थ आंदोलनाच्या पवित्र्यात
दरम्यान डोहळे पाड्यातील लोकांना पाणी आणि वीज देणे जमत नसेल, तर हा विकास नेमका कोणाच्या फायद्यासाठी असा सवाल विचारला जात आहे. याबाबत प्रशासकीय अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता आश्वासनांच्या या फैरींना नागरिक आता कंटाळले असून ‘काम करा, नाहीतर घेरावाला सामोरे जा,’ असा इशारा देण्यात येत आहे.