दिव्यातील प्रवाशांची गर्दीतून सुटका होणार pudhari photo
ठाणे

Diva station redevelopment : दिव्यातील प्रवाशांची गर्दीतून सुटका होणार

रेल्वेच्या मुंबईकडील पादचारी पुलाचे 30 टक्के काम पूर्ण

पुढारी वृत्तसेवा

दिवा : दिवा रेल्वे स्थानकातील मुंबईच्या दिशेकडील पादचारी पुलाच्या रुंदीकरणाचे काम मध्य रेल्वेने सुरु केले आहे. रेल्वे प्रशासनाकडून या पादचारी पुलाच्या रुंदीकरणासाठी लागणारे खांब उभारण्याचे काम पूर्ण झालेले आहे. यासाठी रेल्वे प्रवासी संघटनांकडून आणि नागरिकांकडून सातत्याने मागणी केली जात होती.

या मागणीची दखल घेत कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी मध्य रेल्वे प्रशासनाशी बैठक घेऊन तसेच पत्रव्यवहार करून पुलाच्या रुंदीकरणाबाबत सातत्याने पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्याला यश आले असून पुलाच्या रुंदीकरणाचे काम आता पर्यंत 25 ते 30 टक्के पूर्ण झालेले आहे. या पुलाच्या रुंदीकरणाच्या पुर्णत्वानंतर येथून जाणाऱ्या प्रवाशांना आणि नागरिकांना गर्दीचा सामना करावा लागणार नाही.

दिवा रेल्वे स्थानकातून दररोज हजारो प्रवासी लोकलने मुंबई, कर्जत, कसारा, पनवेल, वसई येथे आपल्या नियमित कामासाठी प्रवास करतात. दिवा रेल्वे स्थानकातून कोकणात जाणाऱ्या रेल्वे प्रवाशांची संख्या मोठी आहे. त्यामुळे दिव्यातील मुख्य ठाणे कडील पूलावर प्रवाशांची एकच गर्दी होत होती. ही बाब प्रवाशी संघटनांनी आणि नागरिकांनी खासदार शिंदे सांगितली होती. तसेच दिवा स्थानकातील उर्वरित कामे जसे की होम प्लॅटफॉर्म उभारणे, फलाटांचे रुंदीकरण आणि लांबी वाढविणे, शेडचे काम करणे, पाणपोई दुरुस्त करणे, शौचालये यांसारखी कामे करण्यात आली. स्थानकातील रेल्वे फाटकातुन रूळ ओलांडल्याने होणाऱ्या अपघातांचे प्रमाण रोखण्यासाठी स्थानकात जाण्यासाठी आणि बाहेर पाडण्यासाठी सरकते जिने देखील बसविण्यात आले आहेत.

मुंबईच्या दिशेने असणारा आणि शहराच्या पूर्व पश्चिम भागाला जोडणारा पादचारी पूल अरुंद असल्याने प्रवाशांना कायमच गर्दीचा सामना करावा लागतो. दिवा शहरातील बहुतांश लोकवस्ती शहराच्या पूर्व भागात आहे. मुख्य बाजारपेठही शहराच्या पूर्व भागातच आहे. यामुळे दिवा स्थानकातील मुंबईकडील पूलावर सकाळ, संध्याकाळी बाजारपेठेत जाणाऱ्या नागरिकांची आणि प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळते. त्यावेळी चेंगराचेंगरी सदृश्य परिस्थिती ही अनेकदा होते.

याच पार्श्वभूमीवर येथील प्रवासी संघटनां आणि नागरिकांकडून पुलाच्या रुंदीकरणाचे काम त्वरित करण्याची मागणी मध्य रेल्वे प्रशासनाकडे आणि कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्याकडे करण्यात आली होती. या मागणीची रेल्वे प्रशासनाने दखल घेत काम सुरु करुन ते 25 ते 30 टक्क्यांपर्यंत पूर्ण झालेले आहे. येत्या काही आठवड्याच्या कालावधीत हे काम पूर्ण झाल्यानंतर गर्डर टाकण्याचे काम पूर्णत्वास जाणार आहे. यामुळे नागरिकांना पुलावरुन जाताना गर्दीचा सामना करावा लागणार नसल्याने प्रवासी संघटनांकडून खासदार डॉ.शिंदे आणि रेल्वे यांचे आभार मानले जात आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT