नेवाळी : शिक्षणासाठी रोज जीव धोक्यात घालावा लागतो, असे विदारक वास्तव श्रीमलंगगड परिसरातील ढोके गावात समोर आले आहे. संत सावळाराम महाराज विद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणताही सुरक्षित पूल नसल्याने थेट नदीपात्रातून शाळेचा मार्ग पार करावा लागत आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर हा प्रवास अधिकच धोकादायक ठरत असून प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहेत.
कल्याण मलंगगड रस्त्यावरील ढोके गाव गाठण्यासाठी शासनाने नदीवर पूल आणि संरक्षण भिंत बांधून रस्ता तयार केला आहे. त्यामुळे खरड गावातून शाळा गाठणे नवीन ढोके गावातील पुलामुळे लांब झाले आहे. त्यामुळे काकडवाल व परिसरातील विद्यार्थी आता नदी पात्रातून थेट शिक्षणाची वारी करताना दिसून येत आहेत.
सध्या पावसाचा जोर कमी असला तरी नदीपात्रातील खडकांवर शेवाळ साचल्याने ते अत्यंत निसरडे झाले आहेत. त्यामुळे पाय घसरून अपघात होण्याचा धोका निर्माण झाला आहे. विद्यार्थी एकमेकांचे हात धरून, पाठीवर दप्तर घेऊन काळजीपूर्वक नदी पार करत असल्याचे चित्र समोर आले आहे. एखादी दुर्घटना घडल्यानंतर प्रशासन जाग होणार का? असा संतप्त सवाल विचारला जात आहे.
विद्यार्थी वर्गाला करावी लागणारी जीवघेणी कसरत पाहता आता नदी पात्रात आणखी एक नवीन पूल उभारून शालेय विद्यार्थ्यांची जीवघेणी वाट कायमची बंद करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. मात्र त्यासाठी लोकप्रतिनिधी, प्रशासन कधी गंभीर्याने लक्ष देणार? हे पाहणे देखील तेवढेच महत्वाचे ठरणार आहे.
विद्यार्थ्यांची वाट सुखकर करा...
विद्यार्थी शाळेतील प्रवास करताना खरड बस स्टॉप येथून ढोके येथील महाविद्यालयात जात असत. मात्र ढोके येथे नवीन पूल झाल्याने मांगरूळ, ढोके, काकडवाल आणि परिसरातील विद्यार्थी थेट नदी पात्रातून धोकादायक प्रवास करत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता शासनाने ढोके गावच्या नदीवर आणखी एक पूल उभारून शालेय विद्यार्थ्यांची वाट सुखकर करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. मात्र त्यासाठी आता लोकप्रतिनिधींचा पाठपुरावा कितपत यशस्वी ठरतोय हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.