शुभम साळुंके
ठाणे : सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे श्री मलंगगड परिसर निसर्गसौंदर्याने खुलून आला असला, तरी पर्यटकांची बेफिकीरी आता चिंतेचा विषय ठरू लागली आहे. अंबरनाथ तालुक्यातील श्री मलंगगड परिसरात हजारो पर्यटकांची गर्दी होत असून, अनेकजण जीवाची पर्वा न करता धोकादायक नदीपात्र, खडक आणि धबधब्यांच्या परिसरात उतरून निसर्गाशी खेळताना दिसत आहेत. मात्र नदीला काही वेळात येणाऱ्या पुरामुळे पर्यटकांचे जीव जाण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
मुसळधार पावसामुळे डोंगरातील ओढे आणि नद्यांच्या पाण्याचा प्रवाह काही क्षणांत वाढत आहे. अशा परिस्थितीत माहिती नसलेल्या ठिकाणी नदीपात्रात उतरणे किंवा घसरड्या खडकांवर चढणे अत्यंत धोकादायक ठरत असतानाही अनेक पर्यटक या धोक्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत. विशेषतः खरड, ढोके, आंभे, कुशिवली, चिंचवली तसेच श्री मलंगगड परिसरातील धबधब्यांवर मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून, पर्यटक थेट पाण्याच्या प्रवाहात उतरून जीव धोक्यात घालत आहेत.
दरवर्षी पावसाळ्यात मलंगगड परिसरात बुडून किंवा पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याच्या घटना घडत असतात. तरीही त्यातून कोणताही धडा घेतला जात नसल्याचे चित्र दिसून येत आहे. पर्यटनाचा आनंद घेण्याऐवजी सोशल मीडियासाठी रिल्स आणि फोटोशूट करण्याच्या अट्टाहासामुळे अनेक जण स्वतःचा जीव धोक्यात घालत आहेत. संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी पोलीस, जिल्हा महसूल प्रशासन तातडीने धोकादायक ठिकाणी बंदी, सुरक्षा पथके, इशारा फलक आणि आवश्यक असल्यास प्रवेशबंदीची अंमलबजावणी करणे गरजेचे बनले आहे.
अन्यथा दरवर्षीप्रमाणे यंदा देखील पर्यटकांचे जीव जाण्याची साखळी सुरु होण्याची भीती स्थानिकांकडून व्यक्त केली जात आहे. वाढती पावसाची संततधार आणि पर्यटकांची गर्दी लक्षात घेता तातडीने जिल्हा प्रशासनाने मनाई आदेश लागू करण्याची ,मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे. अन्यथा दरवर्षीच्या तुलनेत वाढलेली गर्दी मोठी जीवितहानी करण्याची शक्यता नाकारता येत नाही.