ठाणे : राज्य शासनाच्या पुढाकारातून ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ 17 सप्टेंबर ते 31 डिसेंबर 2025 या कालावधीत राज्यभर राबविले जाणार आहे. या अभियानाचा ठाणे जिल्ह्यातील शुभारंभ कल्याण तालुक्यातील खोणी येथून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज, शुक्रवारी होणार आहे. या अभियानाच्या अनुषंगाने जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी माहिती दिली. यावेळी विविध विभागांच्या अधिकार्यांनी अभियानातील उपक्रमांबाबत विस्तृतपणे सांगितले.
अभियानात सुशासन युक्त पंचायत, सक्षम पंचायत, जल समृद्ध, स्वच्छ व हरित गाव, मनरेगा अशा विविध घटकांवर त्या त्या ग्रामपंचायतीला गुण दिले जाणार आहेत. या घटकांशी निगडित विविध उपक्रम तालुका तसेच ग्रामपंचायत स्तरावर राबविले जाणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या वतीने देण्यात आली. अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हा परिषदेमार्फत विस्तृत नियोजन करण्यात आले असून, प्रत्येक गावासाठी एक संपर्क अधिकारी आणि तालुका नोडल अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत.
अभियानाच्या कालावधीत विविध उपक्रम राबवून ग्रामपंचायतींना गुण देण्यात येणार असून त्याआधारे ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदांना एकूण 1,902 पुरस्कार वितरित केले जाणार आहेत.
हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र
राज्यात वृक्षाच्छादन वाढविण्यासाठी हरित महाराष्ट्र - समृद्ध महाराष्ट्र या अभियानांतर्गत ठाणे जिल्हा परिषदेस 1,54,300 वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. या अंतर्गत ठाणे जिल्ह्यातील 5 तालुक्यांमधील सर्व ग्रामपंचायतींमध्ये आज एकत्रित वृक्षारोपण मोहिमेचे राबविण्यात येणार आहे.
अभियानाची वैशिष्ट्ये
विकसित महाराष्ट्र 2047 करिता गतीमान पंचायतराज
ग्रामपंचायतींमध्ये विकासाची स्पर्धा
लोकचळवळीद्वारे विकास
योजनांची प्रभावी अंमलबजावणी
पुरस्काराची एकूण रक्कम 245.20 कोटी
ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद मिळून एकूण 1,902 पुरस्कार
अभियानाचे मुख्य घटक
सुशासन युक्त पंचायत
सक्षम पंचायत
जलसमृद्ध, स्वच्छ व हरित गाव
मनरेगा व इतर योजनांचे अभिसरण
गावपातळीवरील संस्था सक्षमीकरण
उपजिवीका विकास, सामाजिक न्याय
लोकसहभाग व श्रमदान
नाविन्यपूर्ण उपक्रम