डोळखांब : दिनेश कांबळे
शहापूर तालुक्यातील डोळखांब परिसरावर रविवारी (दि. २६) निसर्गान अक्षरशः कहर केला. अवघ्या दोन तासांत झालेल्या मुसळधार पावसाने संपूर्ण परिसर जलमय झाला. घरांमध्ये, दुकानांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे संसार उद्ध्वस्त झाले, तर शेतकऱ्यांच्या डोळ्यांसमोर भाताची रोपे वाहून गेल्याने त्यांच्या वर्षभराच्या मेहनतीवर पाणी फिरले. अतिवृष्टीमुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण आहे.
या भीषण परिस्थितीची दखल घेत भिवंडी लोकसभेचे खासदार बाळ्यामामा म्हात्रे यांनी ठाण्याचे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांना निवेदन देत तातडीने पंचनामे करून बाधित नागरिक व शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची तसेच भविष्यात अशी आपत्ती टाळण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची जोरदार मागणी केली आहे.
रविवारी दिवसभरात डोळखांब परिसरात तब्बल २३१ मिमी पावसाची नोंद झाली. दुपारी ३ ते ५ या दोन तासांत ढग डोंगररांगांमध्ये अडकल्याने पावसाचा प्रचंड मारा झाला. हेदवली पाडा, डोळखांब बाजारपेठ आणि आसपासच्या भागात घरांसह व्यापारी आस्थापनांमध्ये पाणी घुसले. किराणा दुकाने, मेडिकल, कपड्यांची दुकाने, जिल्हा परिषद शाळा, शासकीय कार्यालये आणि आरोग्य केंद्रांमध्येही पाणी शिरल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले. याच अतिवृष्टीदरम्यान चोंढे येथील हनुमान धबधब्यावर दोन पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून आपत्तीचे गांभीर्य अधिक अधोरेखित झाले आहे. दरम्यान, परिसराची पाहणी केली असता नागरिकांनी प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली. तलवाडा फाटा ते प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच तलवाडा फाटा ते जुनी आदिवासी आश्रमशाळा या मार्गावरील पारंपरिक मोऱ्या बुजविल्यामुळे डोंगरावरून वाहणाऱ्या पाण्याचा नैसर्गिक मार्ग बंद झाला आहे. परिणामी हे पाणी थेट बाजारपेठ, घरे, दुकाने आणि शासकीय आस्थापनांमध्ये घुसत असल्याचे नागरिकांनी सांगितले.