भिवंडी : सुमित घरत
अवकाळी पावसाने प्रथमतः खरीप हंगामातील भातशेतीतून तोंडाशी आलेला घास शेतकऱ्यांकडून हिरावून घेतला. त्यानंतर रब्बी हंगामात भाजीपाला लागवड आणि कडधान्याची नासाडी केली आहे. त्यातच आता ऐन गुलाबी थंडीत वातावरणीय बदलाचा फटका तूर, वालाच्या शेंगा उत्पादक शेतकऱ्यांनाही बसल्याचे चित्र ठाणे - पालघर जिल्ह्यातून समोर येत आहे. कारण आतापर्यंत वालाच्या शेंगांचे उत्पादनच झालेले नाही. तर तूर शेंगाचे उत्पादनही मुबलक प्रमाणात झाल्याचे शेतातून स्पष्ट होत आहे. त्यामुळे शेंगा प्रेमींना ग्रामीण भागातील गावठी शेंगांसाठी वाट पहावी लागणार आहे.
तत्पूर्वी तूर, वालाच्या शेंगांची आवक मार्गशिष महिन्यापासून चांगल्या प्रमाणात होत होती. मात्र मागील एक दोन वर्षांपासून अवकाळी पाऊस अधून मधून हजेरी लावत असल्याने वालाच्या शेंगांचे उत्पादन लांबणीवर जात असल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान सद्यस्थितीत ठाणे-पालघर मधील भाजीपाला बाजारातील उपलब्ध असलेल्या वालाच्या शेंगा ह्या अधिकतम नाशिक जिल्ह्यातून येत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. त्यामुळे ऐन थंडीत शेंगा प्रेमींच्या जिभेला हव्या असणाऱ्या ग्रामीणमधील गावठी शेंगांच्या चवीचा आस्वाद घेता येत नसून गावठी शेंगांची पारख असलेले ग्राहकांची हिरमोड होत असून असे ग्राहक नाशिक जिल्ह्यातील शेंगा खरेदी करण्यास कानाडोळा करत असून गावठी शेंगांच्या प्रतिक्षेत असल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, पूर्वीपासून खरीप हंगामातील भात शेतीच्या लावणीच्या वेळेला शेत बांधावरील शेतात तूर, वालाच्या शेंगांच्या बियाणांची लागवड केली जात होती. त्या शेंगांचे उत्पादन मार्गशिष महिन्याच्या प्रारंभी होऊन बाजारात अशा गावठी शेंगांची आवक मोठ्या प्रमाणात होत होती. तर त्यानंतर भात कापणीनंतर लागवड केलेल्या वालाच्या शेंगांचे उत्पादन जानेवारी, फेब्रुवारीपर्यंत मोठ्या प्रमाणात होत होते.
परंतु मागील काही वर्षांपासून च्या अवकाळीने भातशेतीसह भाजीपाला, कडधान्याचा अक्षरशः चुराडा केला असतानाच आता भातशेतीतील लावणी आणि कापणीचा कालावधी लांबल्याने तूर, वालाच्या शेंगांची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांचेही गणित कोलमडले असून शेंगांच्या उत्पादनाची प्रतीक्षा करावी लागत असल्याने शेतकऱ्यांना नुकसान सहन करावा लागत आहे.
अलीकडील बदलत्या हवामान स्थितीचा पिकांवर परिणाम होत असून ठाणे - पालघर जिल्ह्यात चालू हंगामात पावसाचा कालावधी अपेक्षेपेक्षा मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे जमिनीत जास्त काळ ओलावा टिकून राहिला. परिणामी खरीप पिकांपैकी भात कापणीस विलंब झाला. याचा थेट परिणाम म्हणून रब्बी हंगामातील कडधान्य पिकांच्या पेरणीस उशीर झाला.विशेष म्हणजे खरीपातील वाल व तूर पिकांच्या वाढीवरही या हवामान बदलाचा प्रतिकूल परिणाम झाला आहे.
शेतकऱ्यांना मार्गदर्शन आवश्यक
दीर्घकाळ ओलावा व सूर्यप्रकाशाचा अभाव यामुळे या पिकांत फुलोरा येण्यास विलंब झाला असून पिकांची वाढ मंदावलेली दिसून येत आहे. दरम्यान दरांमध्ये अस्थिरता दिसत असली तरी कृषी विभाग परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून असून शेतकरी व व्यापाऱ्यांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. तर हवामानातील बदलानुसार पिक व्यवस्थापन, कीड-रोग नियंत्रण व आंतरमशागत बाबत शेतकऱ्यांना कृषी विभागामार्फत आवश्यक मार्गदर्शन करण्यात येत आहे.
चालू खरीप हंगामात पावसाचा कालावधी वाढल्यामुळे जमिनीत ओलावा जास्त काळ राहिला. भात कापणी उशिरा झाली. त्यामुळे रब्बी हंगामातील कडधान्य पेरणी उशिरा झाली. तसेच खरीप मधील लागवड असलेली वाल, तूर पिकाच्या वाढीवर सुद्धा त्याचा परिणाम झाला असून फुलोऱ्यावर येण्याचा कालावधी वाढला. परिणामी दुसऱ्या जिल्ह्यातील आवक वाढली आहे. तसेच यावेळी ठाणे पालघर जिल्ह्यातील भातपिक शेतकऱ्यां प्रमाणेच तूर, वाल उत्पादनातील शेतकऱ्यांनाही वातावरणीय बदलामुळे मोठ्या प्रमाणात नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे.डी. सी. शिंदे, भिवंडी, तालुका कृषी अधिकारी