ठाणे: वागळे इस्टेट येथील इंदिरानगर भागात सोमवारी रात्री विजेच्या झटक्याने समर शेख (6) याचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली. या घटनेनंतर परिसरातील रहिवासी आक्रमक झाले. त्यांनी महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. तसेच श्रीनगर पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या मांडला.
इंदिरानगर भागातील रुपादेवी पाडा परिसरातील एका चाळीमध्ये समर त्याच्या कुटुंबासोबत एकमजली घरात राहत होता. सोमवारी रात्री 9.15 वाजताच्या सुमारास घराबाहेरील लोखंडी जिन्याजवळ वाळत टाकलेली गोधडी काढण्यासाठी गेला. त्यावेळी त्याला विजेचा झटका बसला. या घटनेनंतर त्याच्या पालकांनी तात्काळ त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले.
परंतु उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. अखेर संतापलेल्या रहिवाशांनी, भागातील नगरसेवक अमित सरैय्या यांनी पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या मांडला. महावितरणच्या हलगर्जीपणामुळे समर याचा मृत्यू झाल्याचा आरोप रहिवाशांनी केला. महावितरणच्या संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, याप्रकरणाची नोंद श्रीनगर पोलीस ठाण्यात झाली आहे. मंगळवारी पोलीस अधिकाऱ्यांनी आणि महावितरणच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. इंदिरानगर भागात अनेक ठिकाणी महावितरण कंपनीच्या तारा घरांजवळ लोंबकळत्या अवस्थेत आहेत. त्यामुळे आणखी एखादी गंभीर घटना घडण्याची भिती नागरिक व्यक्त करत आहे.