ठाणे

ठाणे : पंतप्रधान नरेंद्र मोदींना हरवणे अशक्‍य, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा काँग्रेसवर हल्लाबोल

निलेश पोतदार

ठाणे : पुढारी वृत्तसेवा देशाचा विकास करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत, तर देश बुडवण्यासाठी इंडिया अलायन्स आहे. मोदींच्या विरोधात एकजण रॅली आणि सभा घेत आहे तो फेल जाणार असून, मोदींना हरवणे कठीणच नाही तर अशक्य आहे असा जोरदार हल्लाबोल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेसवर केला. विरोधकांकडे मशाल नसून आयस्क्रीमचा कोण आहे जो उन्हात वितळणार असल्याचा टोला लगावत मुख्यमंत्र्यांनी नाव न घेता उद्धव ठाकरे यांच्यावरही यावेळी निशाणा साधला. मागचा उमेदवार आपल्याच मेहनतीवर निवडणूक आला असून आता 400 पार मध्ये नरेश म्हस्के हवे की नको? असा सवाल करत बूथ स्तरावर जोरदार काम करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी महायुतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना केले.

उशिरा उमेदवारी जाहीर झाल्याने अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांनी मोठे शक्तिप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर टेभी नाक्यावर मुख्यामंत्र्यांची जाहीर सभा घेण्यात आली. यावेळी त्यांनी काँग्रेस आणि विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. अर्ज भरण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मात्र आले नाहीत, तर खासदार श्रीकांत शिंदे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री म्हणाले, मोदींना पंतप्रधान करण्यासाठी उन्हा तान्हात लोकं एकत्र येत आहेत. या देशात यापूर्वी बॉमस्फोट आणि आतंकवादी कारवाया झाल्या मात्र 2014 नंतर एकाने तरी हिंमत केली का अशा कारवाया करण्याची.

मोदींनी घरात घुसून मारू असा दमच पाकिस्तानला दिला असून केवळ एवढ्यावर न थांबता सर्जिकल स्ट्राईक देखील केले. मोदी हे देशासाठी निरंतर काम करत असून त्यांनी आणि मी एक दिवस पण सुट्टी घेतली नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ज्या संविधानावर देश चालतो ते कोणीही बदलू शकत नाहीत उलट बाबासाहेबांना पराभूत करण्याचे काम काँग्रेसने केले हा इतिहास विसरता येणार नसल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. २०१५ नंतर मोदी यांनी संविधान दिन साजरा करण्यास सुरुवात केली असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
नरेश म्हस्के यांचा उमेदवारी अर्ज नव्हे तर विजयाचा फॉर्म भरून आलो आहे.

हा धर्मवीरांचा ठाणे जिल्हा आहे, बाळासाहेबांचा बालेकिल्ला आहे. सर्व पक्ष महायुयीच्या सोबत आहेत कारण विकासाच्या सोबत आहे. या ठिकाणी कितीही सभा झाल्या तरी बुथवर काम करायचे आहे, बुथवर काम करून हक्काचे मतदार आपल्याला उतरवायचे आहेत. मागील निवडणुकीत उमेवरला लीड कोणी दिली, मेहनत कोणी केली, मोदी सांगतात बुथची लढाई जिंका, मागच्या अनेक निवडणुकांचा रेकॉर्ड आपण तोडू शकतो, धर्मवीरांना साजेसे असे काम करायचे असून, नरेश म्हस्के यांना निवडून आणण्याचे आवाहन त्यांनी महायुतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना केले.

उद्धव ठाकरे यांच्यावर साधला निशाना…

दोन वर्षात महायुतीच्या सरकारने केलेल्या कामाची पोचपावती मतदार देतील असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. तुमचा मुख्यमंत्री ठाणेकर आहे, म्हणून दोन वर्ष बंद झालेला विकास सुरू झाला. दोन वर्षे सण बंद होते. त्यावरचे निर्बंध काढले, फेस बुक, इंस्टा आणि घरी बसून सरकार चालवता येत का ? आधी पण मीच काम करत होतो. क्रेडिट दुसरे घेत होते. कोरोना काळात पीपी किट घालून काम केले, राज्यकर्त्यांच्या अहंकारामुळे राज्य अधोगतीला असल्याचा टोला मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.
नाईकांची उपस्थिती…

नरेश म्हस्के यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नवी मुंबईमधून भाजपच्या कार्यकर्त्यांकडून राजीनामे देण्यात आले होते. तर ठाण्यातही नाराजी पाहायला मिळाली. त्यामुळे गणेश नाईक उपस्थित राहतील कि नाही याबाबत साशंकता व्यक्त करण्यात येत होती. मात्र अर्ज भरताना गणेश नाईक, माजी खासदार संजीव नाईक, आमदार मंदा म्हात्रे, गीता जैन, संजय केळकर, संजय वाघुले हे भाजपचे नेते आवर्जून उपस्थित होते. शिवसेनेकडून आमदार प्रताप सरनाईक, माजी आमदार रवींद्र फाटक, मीनाक्षी शिंदे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT