ठाणे/मुंबई: राज्यात महायुतीमध्ये विधान परिषदेच्या जागांवरून रस्सीखेच सुरू असताना ठाणे विधान परिषदेच्या जागेवरून नवे डावपेच समोर येऊ लागले आहेत. ठाणे विधान परिषदेच्या जागेसाठी शिंदेच्या शिवसेनेचे विद्यमान आमदार रवींद्र फाटक यांचे नाव जवळपास निश्चित झाले असताना भाजपने अचानक पडद्यामागून हालचाली करत उपमुख्यमंत्री शिंदे यांना शह देण्यासाठी बहुजन विकास आघाडीचे माजी महापौर राजीव पाटील यांच्याशी बोलणी सुरू केल्याचे वृत्त आहे.
विशेष म्हणजे रवींद्र फाटक यांनी याच आठवड्यात बविआचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांची भेट घेत पाठिंब्यासाठीचा प्रस्ताव दिला. त्याच बविआशी भाजपने संधान साधल्याने शिवसेना-भाजपमध्ये राजकीय संघर्ष वाढण्याची चिन्हे आहेत.
भाजप खासदार हेमंत सावरा आणि आमदार राजन नाईक यांनी बहुजन विकास आघाडीचे माजी महापौर राजीव पाटील यांची भेट घेत परिषद निवडणुकीची नवी समीकरणे मांडली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिंदे गटाला शह देण्याचा भाजपचा डाव म्हणून राजीव पाटील हे ठाणे विधान परिषदेच्या रिंगणात भाजपकडून उतरू शकतात.
हितेंद्र ठाकूर यांचे पुत्र क्षितिज ठाकूर यांना ठाणे विधान परिषदेच्या रिंगणात उतरवण्याच्या दृष्टीने शिवसेनेने बोलणी केली असताना ठाकूरांच्याच घरातून आणखी एक उमेदवार पुढे आणण्याचा प्रयत्न भाजपने चालवला आहे. आता भाजपने बविआचे उमेदवार म्हणून राजीव पाटील यांच्या पाठीशी ताकद उभी करायची ठरवल्यास तो एकनाथ शिंदे यांना मोठा शह ठरू शकतो.
सध्या ठाणे विधान परिषद निवडणुकीच्या रिंगणात रवींद्र फाटक, क्षितिज ठाकूर आणि राजीव पाटील अशा तीन नावांची चर्चा आहे. महायुतीमध्ये ठाण्याच्या जागेवर तोडगा निघून ती कोणाच्या वाट्याला जाणार आणि उमेदवार कोण असणार, याबद्दल आता उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
ठाणे विधान परिषदेच्या निवडणुकीत ट्विस्ट
ठाणे विधान परिषदेच्या या जागेवर शिवसेनेचे रवींद्र फाटक सुरुवातीपासून इच्छुक आहेत. मात्र, एकनाथ शिंदे बविआच्या क्षितिज ठाकूर यांच्या नावाचा विचार करत असल्याची चर्चा आहे. त्यासाठी बविआ शिवसेनेत विलीन होणार असल्याची चर्चाही राजकीय वर्तुळात रंगली.
बहुजन विकास आघाडीचे एकूण 71 नगरसेवक आहेत. सध्या भाजपकडे 444 नगरसेवकांचे संख्याबळ आहे, तर शिवसेनेकडे 346 मतं आहेत. बविआची साथ मिळाल्यास शिंदे गटाची ताकद वाढेल.
मात्र, क्षितिज ठाकूर यांना विधान परिषदेची उमेदवारी देण्याच्या मोबदल्यात हितेंद्र ठाकूर बविआ शिवसेनेत विलीन करणार की, आपले स्वतंत्र राजकीय अस्तित्व कायम ठेवत शिवसेनेला पाठिंबा देतात यावर सारी समीकरणे अवलंबून आहेत.