भिवंडी: भिवंडी शहरात भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला असून रविवारी एकाच दिवशी कामतघर परिसरातील ब्रह्मानंद नगर येथे एका पिसाळलेल्या कुत्र्याने ३२ जणांना चावा घेतला. त्यापैकी दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
रविवारी सायंकाळी ब्रह्मानंद परिसरात मुले बाहेर खेळत असताना एका पिसाळलेल्या कुत्र्याने त्यांच्यावर हल्ला केला व चावा घेण्यास सुरुवात केली. पाहता पाहता या कुत्र्याने ३२ जणांना चावा घेतला. ज्यामध्ये बहुसंख्य लहान मुले आहेत.
त्यांच्यावर स्व.इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यापैकी सुनील जयस्वाल वय ३ वर्षे,ग्रंथ हरेश डोंगर वय ७ वर्षे यांना अधिक जखमा असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करून घेत सोमवारी सकाळी घरी पाठवले.
गेल्या चार महिन्यांत भिवंडीत ३,२९२ नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतला. या उपद्रवामुळे सर्वत्र दहशतीचे वातावरण आहे. इदगाह,शांतिनगर, कामतघर, नदीनाका, गायत्रीनगर, निजामपुरा, कोंबडपाडा यांसह शहरातील विविध भागांत मोकाट कुत्र्यांच्या झुंडी रस्त्यांवर फिरताना दिसतात. त्यांचा सर्वांत मोठा धोका पादचारी व दुचाकीस्वारांना निर्माण झाला आहे.