भिवंडी: प्रेमप्रकरणात प्रतिसाद देत नसल्याने व मोबाईल फोन उचलत नसल्याच्या रागातून महिलेस घरी बोलवून तिची हत्या करून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह निर्जनस्थळी जाळून टाकणाऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळण्यात भिवंडी गुन्हे शाखेस यश मिळाले आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सदरच्या महिलेची आरोपी तरुणासोबत ओळख होती. 11 मे रोजी त्याने महिलेस आपल्या घरी बोलावून घेतले. महिलेने मोबाईल देण्यास नकार दिल्याने त्यांच्यात भांडण झाले.
या वादात आरोपीने महिलेची दुपारी हत्या करून मृतदेह घरातच ठेवून रात्र होण्याची वाट पाहिली. मध्यरात्रीनंतर अडीच वाजताच्या सुमारास महिलेचा मृतदेह प्लास्टीक पोत्यामध्ये भरून परिसरातील हॉटेलनजीकच्या मैदानात येथे मोकळ्या जागेत घेऊन जात तेथे भंगार कपड्याचा धाग्यांचा वापर करून मृतदेह जाळून टाकून पुरावा नष्ट केला होता.
याप्रकरणी भिवंडी शहर पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या गुन्ह्याचा तपास भिवंडी गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथक करीत होते.
कौशल्यपूर्ण तपास करून आरोपी द्वारकाप्रसाद वर्मा (वय 42) या संशयितास ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता, त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली. शीतल राऊत यांच्या मार्गदर्शना खाली पथकाने ही कामगिरी केली आहे.