भिवंडी: भिवंडी पालिका क्षेत्रातील सफाई कर्मचारी यांचा कामचुकारपणा व गैरहजेरी यामुळे शहरातील स्वच्छतेचा बोजबारा उडाला असतानाच, पालिका आयुक्त अनमोल सागर यांनी गैरहजर व कामचुकार कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उचलला आहे.
दररोज वेगवेगळ्या सफाई कर्मचारी कॅबिनला दिल्या जाणाऱ्या सरप्राईज व्हिजिटमध्ये अनेक कामगार गैरहजर असल्याचे आढळून आले आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.
आयुक्त अनमोल सागर यांनी मागील चार दिवसात दोन सफाई कर्मचारी कॅबिनला अचानक भेट दिली. त्यावेळी गैरहजर १५ कर्मचाऱ्यांना नोटीस बजावण्यात आली तर स्वच्छता निरीक्षक दिगंबर जाधव यांना निलंबित करण्यात आले आहे.
तर मंगळवारी आढळून आलेल्या दोन सतत गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्याबाबत कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे सफाई कर्मचारी वर्गात खळबळ उडाली असून सर्व कामगार सकाळी सात ते दोन या वेळेत आपल्या कामावर हजर राहण्याचे चित्र दिसू लागले आहे.
शहरातील स्वच्छतेचे काम
नियोजनबद्ध होण्यासाठी स्वच्छता विभागाकडून विशेष कार्यक्रम आता राबवला जाणार आहे. ज्यामध्ये प्रत्येक सफाई कर्मचाऱ्यास सातशे मीटरचा परिसर स्वच्छतेची जबाबदारी देण्यात येणार आहे. या सर्व कर्मचाऱ्यांच्या अखत्यारीत कोणता परिसर येतो याबाबतची यादी नावासह प्रशासनाने तयार केली आहे.
लवकरच ही कर्मचाऱ्यांची यादी सार्वजनिक करण्यात येणार आहे जेणेकरून नागरिकांनासुद्धा आपल्या परिसरात स्वच्छतेसाठी कोणत्या कर्मचाऱ्याची नेमणूक केलेली आहे यावर लक्ष ठेवणे सोपे होणार असल्याची माहिती आयुक्त अनमोल सागर यांनी दिली आहे.
सफाई कर्मचाऱ्यांनी सकाळी सात ते दोन या दरम्यान कर्तव्यावर हजर असणे बंधनकारक असून नागरिक व लोकप्रतिनिधी यांनी सुद्धा यावर लक्ष ठेवण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.
जेणेकरून शहर स्वच्छतेसाठी प्रशासन करीत असलेल्या उपाययोजनांना नागरिकांनी पुढाकार घेऊन त्यांना साथ देण्याची गरज आहे, असे सांगत यापूर्वी असंख्य कामगार गैरहजर राहण्यासाठी उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करत होते; परंतु आता गैरहजर कर्मचाऱ्यांना जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडील वैद्यकीय प्रमाणपत्र बंधनकारक केले आहे ज्यामुळे या सततच्या गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना पायबंद घालता येणार आहे.
कारवाईला सुरुवात...
मागील आठवड्यामध्ये पालिका आयुक्तांनी जुन्या पालिका प्रशासकीय इमारतीत दिलेल्या भेटीदरम्यान १५ कर्मचारी आढळून आले. या सर्व कर्मचाऱ्यांची नोटीस बजावून त्या ठिकाणाहून बदली प्रभागांमधील सफाई कॅबिन येथे करण्यात आली आहे.
तर स्वर्गीय राजय्या गाजंगी सभागृह या ठिकाणी असलेले दहा कर्मचारी यांना सुद्धा त्या ठिकाणावरून सफाई कामासाठी प्रभागात नियुक्त करण्यात आले आहे. ज्यामुळे काम न करता बसून राहणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या कमी होणार असल्याने त्याचा फायदा शहर स्वच्छतेला होणार आहे.
कर्मचाऱ्यांचे वेतनकपात...
सफाईच्या कामाबाबत पालिका प्रशासन गंभीर असून त्या पार्श्वभूमीवर दररोज आयुक्तांसह सर्व वरिष्ठ अधिकारी प्रभाग अधिकारी हे विविध सफाई कर्मचारी केबिन येथे भेट देत असून त्यावेळी गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांचे त्या दिवशीचे वेतन कपात केले जात आहे.
ही संख्या सरासरी २० ते २५ असल्यामुळे मागील काही दिवसांत अशा कारवाईत सुमारे ४०० कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन कपात करण्यात आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.