ठाणे: महावितरणच्या स्मार्ट मीटर मधील ‘टाईम ऑफ डे’ (टीओडी) च्या सकाळी ९ ते सायंकाळी ५ या कालावधीत वीज वापर करणाऱ्या घरगुती ग्राहकांना प्रति युनिट ८५ पैसेची सुट मिळते. अशाच, नियोजनबद्ध पद्धतीने वीज वापरल्यामुळे भांडुप परिमंडलातील ७ लाख ७५ हजार २९१ वीज ग्राहकांनी एप्रिल २०२६ ते जुलै २०२६ या चार महिन्यात रु. १३ कोटी ४० लाख वाचवले आहेत.
केंद्र शासन व महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाच्या निर्देशानुसार महावितरणच्या सर्व १६ परिमंडलात सध्या स्मार्ट मीटर लावण्याची मोहीम सुरु आहे.
देशात स्मार्ट प्रणालीचा अवलंब करून ग्राहकांना उत्तम सेवा देण्याच्या उद्देशाने ही मोहीम सुरू करण्यात आली होती. महावितरणच्या भांडुप परिमंडलात आतापर्यंत उच्चदाब व लघुदाब घरगुती ग्राहक मिळून एकूण ९ लाख ४१ हजार ९६४ स्मार्ट मीटर बसवले आहेत.
ठाणे मंडळातील भांडुप विभागातील ६१,९९७ ग्राहकांनी १ कोटी ८ लाख ८३ हजाराची सूट घेतली आहे, मुलुंड विभागातील ४६,९०४ ग्राहकांनी १ कोटी १४ लाख ८४ हजार, ठाणे-१ विभागातील २५,३९४ ग्राहकांनी ४३ लाख ५७ हजार, ठाणे-२ विभागातील ३४,९४८ ग्राहकांनी ७५ लाख १८ हजार तर वागळे इस्टेट विभागातील १,०१,७७४ ग्राहकांनी २ कोटी २५ लाख ४१ हजार असे एकूण ठाणे मंडळात २,७१,०१७ ग्राहकांनी ५ कोटी ६७ लाख ८३ हजाराची वीज बिलात सवलत मिळवली आहे.
स्मार्ट मीटरमुळे केवळ अचूक आणि पारदर्शक वीज वापराची सुविधा मिळत नाही, तर ‘टाईम ऑफ डे’ योजनेद्वारे वीज वापराचे नियोजन करून थेट वीज बिलात बचत करण्याची संधीही मिळत असल्याची माहिती महावितरणच्या भांडुप परिमंडळाचे मुख्य अभियंता संजय पाटील यांनी सांगितले.
काय आहे टाईम ऑफ डे
ग्राहकांनी सकाळी ९ ते सायंकाळी ५ या सवलतीच्या कालावधीत वीज वापर करून स्मार्ट मीटरच्या माध्यमातून ग्राहकांनी वीज बचतीसोबतच वीज बिलातही बचत करणारी ही सवलत आहे.