Thane Water Cut (Pudhari File Photo)
ठाणे

Badlapur Water Cut Cancelled: बदलापूरकरांची पाणीकपात रद्द! गेल्या दोन महिन्यांपासून पाण्यासाठी नागरिकांचे होत होते हाल

ढील एक-दोन दिवसही पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याने नागरिकांचे हाल होत होते.

पुढारी वृत्तसेवा

बदलापूर: एल-निनोच्या संभाव्य संकटाचे कारण देत ठाणे जिल्ह्यात लागू करण्यात आलेली १५ टक्के पाणी कपात अखेर रद्द करण्यात आली आहे. १ जूनपासून सुरू असलेल्या कपातीमुळे त्रस्त झालेल्या बदलापूरकरांना तब्बल दोन महिन्यांनंतर मोठा दिलासा मिळाला आहे.

आठवड्यातून एक दिवस विविध भागांत टप्प्याटप्प्याने पाणीपुरवठा बंद केला जात होता. मात्र पाणी बंद असलेल्या दिवशीच नव्हे, तर पुढील एक-दोन दिवसही पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याने नागरिकांचे हाल होत होते.

त्यातच पुन्हा सात दिवसांनी कपात होत असल्याने शहरातील पाणीपुरवठ्याचे वेळापत्रकच कोलमडले होते. विशेष म्हणजे जुलै महिन्यात संपूर्ण शहरात मुसळधार पाऊस कोसळत असतानाही पाणी कपात कायम होती.

उल्हास नदीने पूरपातळी आणि धोक्याची पातळी ओलांडली, शहरातील अनेक भागांत पुराचे पाणी शिरले; मात्र नळातून पाणी देताना मात्र कपातीचे धोरण सुरूच राहिले. त्यामुळे ‘भर पावसात पाणी कपात कशासाठी?’ असा संतप्त सवाल बदलापूरकरांकडून उपस्थित केला जात होता. शासनाकडून एल-निनोचे संकट असल्याचे कारण देत हा निर्णय कायम ठेवण्यात आला होता.

भरपावसात कपात का?

पाणी कपात रद्द झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला असला, तरी मुसळधार पाऊस आणि नदीला पूर आलेला असतानाही कपात सुरू ठेवण्याची गरज नेमकी काय होती, याचे उत्तर अद्याप मिळालेले नाही. त्यामुळे कपात रद्द झाली असली तरी प्राधिकरणाच्या ढिसाळ नियोजनाविरोधातील बदलापूरकरांचा संताप कायम आहे. दोन महिने पाण्यासाठी नागरिकांना त्रास सहन करावा लागला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT