डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने एक आगळावेगळा उद्यान प्रकल्प हाती घेतला आहे. महानगरपालिका क्षेत्रात असा एक प्रकल्प उभा राहणार आहे ज्यामुळे कल्याण-डोंबिवलीतील ऑटीझमग्रस्त रुग्ण व यांच्या पालकांच्या नजरा लागल्या आहेत.
कल्याणपासून जवळच असलेल्या बारावे गावात ऑटीझम व्हिलेज साकारले जाणार असून असे आगळेवेगळे व्हिलेज बारावे गावाजवळून जाणाऱ्या रिंग रोडलगत उभारण्यात येणार आहे. सदर ऑटीझम व्हिलेज जवळपास १२ हजार ७७२ चौरस मीटर इतक्या परिसरात तयार होत आहे. ऑटीझम व्हिलेज अंतर्भूत असलेल्या उद्यानात एका बाजूस ऑटीझमग्रस्त मुलांसाठी ऑटीझम व्हिलेज आणि दुसऱ्या बाजूला सर्वसामान्य नागरिकांसाठी उद्यान साकारले जात आहे.
या व्हिलेजमध्ये स्वमग्नता असणाऱ्या मुलांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. यामुळे महापालिका आणि रिजनमधील ऑटीझमग्रस्त रुग्णांना थेरेपी सुविधा उपलब्ध होणार आहे. एमएमआर उर्वरित भागात भव्य उद्यान, आधुनिक कारंजे, बास्केटबॉल कोर्ट, एम्म्पोथिएटर, मियावाकी जंगल, स्केटिंग रिंग, जॉगिंग आणि सायकलिंग ट्रॅक, कॅफेटेरिया, टॉयलेट, सोलर सिस्टम, आदी विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. विशेष म्हणजे हे ऑटिझम व्हिलेज या विकासकांमार्फत अॅमिनिटी टीडीआरमधून तयार होत आहे. महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी शनिवारी सदर स्थळी पाहणी केली.
२ एप्रिल रोजी वर्ल्ड ऑटीझम अवेअरनेस डे चे औचित्य साधून या ऑटीझम व्हिलेजचे लोकार्पण होण्याच्या दृष्टीने कामकाज पूर्ण करण्यासंदर्भात संबंधितांना निर्देश दिले. तसेच दर आठवड्याला स्थळपाहणी करून आढावा घेतला जाईल, असेही निर्देश आयुक्त अभिनव गोयल यांनी यावेळी बोलताना दिले.
यावेळी नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक संतोष डोईफोडे, मुख्य उद्यान अधीक्षक संजय जाधव, विकासक सुदेश मौर्यांनी, जय लालवानी, सुनील पुनेजा, दिलीप पाठारे व कन्सल्टंट सूरज पाटील उपस्थित होते.
काय आहे हा ऑटीझम आजार ?
ऑटीझम हा मेंदूच्या विकासाशी संबंधित एक आजार आहे, जो संवाद, सामाजिक वर्तन आणि वर्तणुकीतील समस्यांमुळे ओळखला जातो. भारतात दर १०० पैकी किमान एखादे मूल ऑटीझमग्रस्त असते. ज्यामध्ये मुलांचे प्रमाण मुलींपेक्षा ४ पटीने जास्त आहे. या मुलांमध्ये लक्ष केंद्रित न करणे, वेगळे राहणे किंवा विशिष्ट हालचाली करणे अशी लक्षणे दिसू शकतात. एक ते दीड वर्षांचे मूल कडेवर घेतल्यानंतर जिवंत न वाटणे, नजरेला नजर न मिळवणे, बोलण्यात उशीर होणे, किंवा एकाच कृतीची पुनरावृत्ती करणे ही प्रमुख लक्षणे आहेत.