अंबरनाथ : मागील चोवीस तासात अंबरनाथ मध्ये ९१ मिमी पावसाची नोंद झाली असून, मुसळधार पावसामुळे अंबरनाथ मधील सखलभागा पाण्याखाली गेल्याने नागरिकांची अक्षरशः दैना अवस्था झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. एवढेच नाही तर शहराच्या पूर्व भागातील बी कॅबिन रोड, निसर्ग ग्रीन परिसर, शहराच्या पश्चिम भागातील कल्याण- बदलापूर राज्य महामार्गाला नदीचे स्वरूप आले होते. तर येथील प्राचीन शिवमंदिरचा गाभारा देखील पाण्याखाली गेल्याने काहीवेळ दर्शनासाठी मंदिर बंद ठेवण्यात आले होते.
मागील चार दिवसांपासून अंबरनाथ मध्ये मुसळधार पाऊस सुरू असल्याने शहरातील सखल भाग पाण्याखाली गेला होता. शहराच्या पूर्व भागातील बी कॅबिन परिसर, निसर्ग ग्रीन परिसर, प्राचीन शिवमंदिर परिसर, रिलायन्स रेसिडन्सी, कानसई परिसर पश्चिम भागातील कल्याण- बदलापूर राज्य महामार्ग, स्टेशन परिसर, बांगडी गल्ली, सिंधी गल्ली, भगतसिंग नगर, वडोल गाव असे अनेक सखल भाग पाण्याखाली गेले होते. त्यामुळे या परिसरात राहणाऱ्या नागरिकांची दैना झाली होती.
प्राचीन शिवमंदिर शेजारून वाहणारी वालधुनी नदी दुथडी भरून वाहत असल्याने नदीवरील पूल पाण्याखाली गेला होता. यामुळे दुपारच्या वेळेस प्राचीन शिवमंदिराचा गाभारा देखील पाण्याखाली गेला.
अग्निशमन दलाचे विशेष कार्य
अंबरनाथ मधील अनेक सखल भाग पाण्याखाली गेल्याने अंबरनाथ नगरपालिकेच्या अग्निशमन दलावर मोठी जबाबदारी होती. अग्निशमन दलाचे प्रमुख भागवत सोनोने व त्यांच्या टीमने यावेळी दिवसरात्र काम करत उन्मळून पडलेली झाडे बाजूला करणे, धरणात बुडालेल्या व्यक्ती बाहेर काढणे अशी विविध कामे करत आहेत.