ठाणे : ठाणे येथे झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमात ऑक्टोबर हिटमुळे 98 लोकांना भोवळ, चक्कर येणे आणि उच्च रक्तदाबाचा त्रास झाल्याचा प्रकार घडला आहे. दुपारी 4 वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते मात्र त्यांपूर्वीच सुरक्षेच्या कारणाने नागरिकांना एक ते दिड वाजताच प्रवेश देण्यास सुरुवात झाली, गेट पर्यंत पोहचेपर्यंत लांब रांगा लागल्याने नागरिकांना बराच वेळ उन्हात उभे राहावे लागले. त्यामुळे त्रास झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे आतमध्ये पाणी घेऊन जाण्यासही मज्जाव करण्यात आल्याने अनेक महिला आणि पुरुषांना याचा त्रास झाला.
शनिवारी घोडबंदर भागातील बोरीवडे येथे मोदी यांच्या उपस्थित महिला सशक्तीकरण, भूमिपूजन आणि लोकार्पण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्ह्यातील ठाणे, भिवंडी, मीरा भाईंदर आदी भागातून सुमारे १ लाख नागरिक आले होते. दुपारी ४ वाजता मोदी हजेरी लावणार असल्याने दुपारी १ वाजता नागरिकांना बोलविण्यात आले होते. तसेच खारघर येथील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर विशेष खबरदारी घेतण्यात आली. त्या परिसरात १०० बेड्स चे तात्पुरते रुग्णालय उभारण्यात आले होते. तसेच खासगी आणि शासकीय रुग्णालयात ५०० बेड्स राखीव ठेवण्यात आले होईल. याशिवाय उन्हाचा त्रास होऊ नये, यासाठी कार्यक्रमाला आलेल्या प्रत्येकाच्या हाती खाण्याचे पाकीट, पाणी तसेच ओआरएस पाण्याची सुविधा सुद्धा पुरविण्यात आली होती.
दरम्यान, बस स्टॉप ते सभा मंडपापर्यंत १ किलोमीटर पायपीट करावी लागल्याने अनेकांनी संताप व्यक्त केला..त्यातच नवरात्र उत्सव सुरू असल्याने अनेक महिलांचे उपवास असल्याने महिलांना जास्त त्रास झाला. तसेच कार्यक्रम ठिकाणी पंख्यांची सुविधा होती. तरी सुद्धा काहींना उन्हाचा त्रास झाल्याने त्यांच्यावर तत्काळ उपचार करण्यात आले. यात ९८ जणांना चक्कर येणे, रक्तदाब कमी अधिक होणे असा त्रास जाणवला. मात्र त्यांच्यावर तत्काळ उपचार करून सोडण्यात आले. अशी माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली.