ठाणे : महापालिकेच्या कळवा रुग्णालयात 21 नवजात बालकांचा मृत्यू झाल्याने पुन्हा खळबळ उडाली आहे. या प्रकरणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या शिष्टमंडळाने मंगळवारी कळवा रुग्णालयात धडक देत प्रशासनाला धारेवर धरले. त्याचबरोबर ज्यांच्या गलथान कारभारामुळे हा प्रकार घडला, अशा अकार्यक्षम अधिकारी, कर्मचारी, नर्सेस, डॉक्टर्स यांना त्वरित निलंबित करून कायमची रजा द्यावी, अशी मागणी देखील शिवसेनेने यावेळी केली.
ठाणे महापालिकेच्या कळवा रुग्णालयातील कारभाराबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. गेल्यावर्षी एकाच दिवशी 18 जणांचा मृत्यू झाल्याच्या घटनेने महाराष्ट्र हादरला असताना, आता रुग्णालयाच्या अति दक्षता विभागात जून महिन्यात 21 नवजात बालकांचा मृत्यू झाल्याची खळबळजनक बाब उघडकीस आली आहे. या घटनेचे पडसाद राज्याच्या पावसाळी अधिवेशनात उमटले असून याप्रकरणी चौकशी अहवाल तयार करण्याचे आदेश पालिका प्रशासनाने दिले. गेल्या अडीच वर्षापासून रुग्णालयातील कामाचा दर्जा खालावत चालला आहे. वारंवार मृत्यूच्या घटनेमागे काय कारण आहे? रुग्णालयाची आरोग्य यंत्रणा सज्ज आहे का? डॉक्टरांच्या हलगर्जी पणामुळे या घटना घडतात का? याचा विचार करून आरोग्य विभागाने त्वरित लक्ष घालावे, अशी मागणी शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी रुग्णालय प्रशासनाकडे केली.
रुग्णालयातून कोणतीही तक्रार येणार नाही, याची काळजी घ्यावी. अशा प्रकारे भविष्यात कोणतीही तक्रार आली, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष ठाणे जिल्ह्याच्या वतीने कठोर पावले उचलण्यात येतील व त्यामध्ये एखादा अनुचित प्रकार घडला, तर त्याची जबाबदारी रुग्णालय प्रशासनाची असेल, याची दखल घ्यावी.केदार दिघे, ठाणे जिल्हाप्रमुख, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
बरेचदा आपल्याकडील तांत्रिक उपकरणात बिघाड, औषधांचा तुटवडाही यामागची कारणे आहेत. त्यामुळे याची गंभीर दखल घेऊन आपल्या रुग्णालयाच्या कार्यप्रणालीत आमूलाग्र बदल करावा. तसेच रुग्णालयाबाबत बर्याचशा तक्रारी येत असून रुग्णालयात डॉक्टरांची, कर्मचार्यांची संख्या अपुरी असून याचा परिणाम रुग्णांवर होत असल्यास मनुष्यबळ वाढवावे, अशी मागणी यावेळी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने केली.
कळवा रुग्णालयात जिल्ह्याच्या शहरी, ग्रामीण आणि दुर्गम आदिवासी भागातून रुग्ण येतात. अशातच जून महिन्यात बाळंतपणासाठीदेखील गर्भवती महिला मोठ्या संख्येने आल्या होत्या. दरम्यान, या प्रसूती झालेल्या महिलांच्या 90 नवजात बालकांचे वजन 1 किलोपेक्षा कमी होते. तसेच मृत्यू झालेल्या 21 बालकांपैकी 19 बालक हे शहराबाहेरील होते.