भिवंडी : मुख्यमंत्र्यांच्या मर्जीतील खास अधिकारी असा उल्लेख करून भिवंडी महापालिकेचे आयुक्त अजय वैद्य यांच्या भ्रष्ट कारभाराची चौकशी करून त्यांच्यावर निलंबनाच्या कारवाईची मागणी ठाकरे गटाचे भिवंडी सचिव गोकुळ कदम यांनी महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सैनिक यांच्याकडे केली आहे.
त्यांनी मुख्य सचिवांना दिलेल्या निवेदनानुसार, आयुक्त वैद्य यांना मुख्यमंत्र्यांच्या मर्जीतील खास अधिकारी म्हणून संबोधित करीत वैद्य हे बेकायदेशीरपणे आणि नियमबाह्य पद्धतीने निलंबित झालेल्या अधिकारी, कर्मचार्यांशी आर्थिक साटेलोटे करून त्यांना पुन्हा मनपाच्या मुख्य पदांवर कामावर रुजू करून घेत असल्याचे म्हटले आहे. तसेच घनकचरा व व्यवस्थापन विभागातही आयुक्त आणि ठेकेदारांचा संगनमताने भ्रष्टाचार बोकाळल्याचे कदम यांनी सांगून यामुळे भिवंडी शहरात दुर्गंधीने नागरिकांना आरोग्याचे प्रश्न निर्माण होत असून भिवंडीची दुर्दशा झाल्याचे सांगितले आहे. यासह आयुक्त अजय वैद्य यांच्या आशीर्वादाने प्रभाग समिती क्र.1 ते 5 अंतर्गत अनधिकृत बांधकामे फोफावल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
अशा प्रकारे आयुक्त अजय वैद्य यांनी नियुक्ती पासून आजपावेतो अनेक आर्थिक गैर व्यवहार, अनधिकृत बांधकामे, कर आकारणी, नेमणुका व इतर बेकायदेशीर नियमबाह्य कार्य केल्याने त्यांच्या कामाची वरिष्ठ पातळीवरून चौकशी होऊन त्यांच्यावर निलंबनाच्या कारवाईसह प्रशासकीय कार्यवाही व्हावी, अशी विनंती गोकुळ कदम यांनी मुख्य सचिव सुजाता सचिव यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.