डोंबिवली: खाऊ आणण्याच्या बहाण्याने घरातून बाहेर पडून गावी जाण्याच्या ओढीने बारा वर्षीय मुलीने घर सोडल्याची घटना घडली आहे. घर सोडून थेट रेल्वे स्थानक गाठलेल्या १२ वर्षीय अल्पवयीन मुलीला अवघ्या काही तासांत सुखरूप शोधून काढण्यात मानपाडा आणि कल्याण लोहमार्ग पोलिसांना यश आले आहे.
कल्याण पूर्वेकडे असलेल्या पिसवली परिसरातून बेपत्ता झालेल्या या मुलीला शुक्रवारी पालकांच्या स्वाधीन करण्यात आले.कल्याण-मलंगगड रोडला असलेल्या आडीवली-ढोकळी परिसरातील १२ वर्षीय मुलगी लहानपणापासून गावी आजीकडेच राहत होती.
जुलै महिन्यामध्ये तिला पुढील शिक्षणासाठी कल्याणला आणण्यात आले होते. मात्र तिचे कल्याणमध्ये मन रमत नव्हते आणि ती सतत गावी जाण्याचा हट्ट करत असल्याचे पालकांनी सांगितले. गुरुवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास तिने आईकडून खाऊसाठी १० रुपये घेतले आणि दुकानात जाते असे सांगून घराबाहेर पडली.
बराच वेळ होऊनही ती परत न आल्याने पालकांनी पिसवली, मलंगगड रोड, तसेच कल्याण रेल्वे आणि एसटी स्थानक परिसरात तिचा शोध घेतला. मात्र ती कुठेही न सापडल्याने कुणीतरी अज्ञात व्यक्तीने तिला फूस लावून पळवून नेल्याच्या संशयावरून आईने मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
तक्रार दाखल होताच मानपाडा पोलिसांनी गांभीर्य ओळखून तत्काळ तपास सुरू केला. दरम्यान मुलगी घराबाहेर पडल्यानंतर थेट कल्याण रेल्वे स्थानकात पोहोचली होती. स्थानकावर एकटीच संशयास्पद स्थितीत फिरत असल्याने ती कल्याण लोहमार्ग पोलिसांच्या निदर्शनास आली.
पोलिसांनी तिला ताब्यात घेतले. तपासादरम्यान ही मुलगी लोहमार्ग पोलिसांकडे असल्याची माहिती निष्पन्न झाल्यानंतर दोन्ही पोलीस ठाण्यांतील पथकांच्या समन्वयाने शुक्रवारी तिला सुखरूप पालकांच्या स्वाधीन केले. आपली हरवलेली मुलगी काही तासांतच सुखरूप मिळाल्याने पालकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. पोलिसांनी मुलीला शोधून काढल्याने पालकांनी आभार मानले.