ठाणे : पुढारी वृत्तसेवा
ठाणे लोकसभा मतदार संघात 1 लाख 66 हजार बोगस मतदान झाले. बोगस मतदारांबद्दल तक्रार करूनही तक्रारीची दखल घेतली जात नसल्याचा गंभीर आरोप करत, ठाणे लोकसभेचे माजी खासदार राजन विचारे यांनी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत अधिकाऱ्यांना जाब विचारला. आपल्याकडे सर्व पुरावे असून एकदा माफ करेन परत माफ करणार नाही असा इशाराच जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या समोरच अधिकाऱ्यांना दिला.
उद्धव ठाकरे यांची ठाण्याच्या गडकरी रंगायतन येथे जाहीर सभा होणार असून या सभेच्या एक दिवस आधीच राजन विचारे यांनी आक्रमक भूमिका घेत अधिकाऱ्यांना खडसावले. बोगस मतदार नोंदणी, मतदार नोंदणीसाठी पैसे घेतले जात असल्याचा आरोप करत राजन विचारे यांनी यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार दाखल केली होती. मात्र त्यांच्या तक्रारीची दखल घेतली गेली नव्हती.त्यामुळे राजन विचारे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांची यांची भेट घेऊन बैठक अधिकाऱ्यांना यासंदर्भात जाब विचारला.
लोकसभेच्या निवडणुकीत बोगस मतदार नोंदणी झाली होती. मीरा भाईंदर मध्ये34 हजार नावे दुबार होती.ओवळा माजीवडा मतदार संघात 29 हजार 82 , कोपरी 21 हजार ,ठाणे 16,700, ऐरोली 39 हजार , बेलापूर 25 हजार असे एकुन 1 लाख 66 हजार दुबार नावे होती.संध्याकाळी 5 नंतरही मतदान करण्यात आले.त्यामुळे 1 लाख 66 हजार दुबार मतदान झाले असल्याचा आरोप राजन विचारे यांनी केला आहे.यासंदर्भात जिल्हाधिकारी यांना संपूर्ण यादी आम्ही दिली असल्याची माहिती विचारे यांनी दिली.याचा पर्दाफाश आम्ही केला आहे.लोकसभेला तुम्ही हे काम केलं मात्र विधानसभेत जर हा प्रकार केले तर याद राखा , विधानसभेला हे खपवून घेणार असा इशाराच विचारे यांनी अधिकाऱ्यांना दिला आहे.