Women's budgets collapsed due to rising inflation
टेंभुर्णी, पुढारी वृत्तसेवा : इंधन दरवाढ आणि महागाईमुळे जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत. डाळी, भाजीपाला आणि घरगुती गॅसच्या वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्य नागरिकांचे व गृहिणींचे घरगुती बजेट पूर्णपणे कोलमडले आहे. ही दरवाढ जवळपास दहा ते पंधरा टक्क्यांनी वाढली आहे.
लाडकी बहीण योजनेमुळे खुश झालेल्या बहिणी आता जीवनावश्यक वस्तूंच्या महागाईमुळे रूसल्या आहेत. गेल्या काही दिवसापासून खाद्यतेलाचे वाढत असलेले दर आणि भाजीपाल्याचे भाव आवाक्याबाहेर गेल्याने बहिणीचे बजेट कोलमडले असून सर्वसामान्यांना दैनंदिन व्यवहारात तारेवरची कसरत करावी लागत आहे.
मागील चार महिन्यापुर्वी ११० रुपये किलो मिळणारे खाद्यतेल आता थेट १५० ते १७० रुपयांवर पोचले आहे. इतर आवश्यक किराणामालाची भावही वाढत असल्याने गृहिणींचा हिरमोड झाला आहे. लाडकी बहीण योजनेमुळे काही काळ आनंदी झालेल्या बहिणी आता मात्र वाढत्या महागाईमुळे त्रस्त झाल्याचे दिसत आहे. दैनंदिन वापरात खाद्यतेल म्हणून सर्वाधिक सोयाबीन तेलाचा वापर केला जातो.
त्यामुळे सोयाबीन तेलाची दरवाढ डोकेदुखी ठरत आहे. डाळी, शेंगदाणा, चना, तूर डाळ, कडधान्य तसेच मसाल्यांच्या पदार्थाच्या किमती देखिल वाढल्या आहेत. कांदा, लसणाचे दरही तीन महिन्यात जवळपास दुपटीने वाढले आहेत. शासनाने लाडकी बहिणा योजनेत महिलांना थेट खात्यात पैसे दिले तर दुसरीकडे मात्र जीवनावश्यक वस्तूच्या वाढत्या महागाईमुळे लाडक्या बहिणीचे स्वयंपाक घरातील आर्थिक बजेट कोलमडले आहे. यामुळे सर्व सामान्य नागरिक त्रस्त झाले आहे.
काही महिन्यांपूर्वी सोयाबीनचे तेल १०५ रुपये किलोने मिळत होते. आता त्यासाठी १८० रुपये मोजावे लागत आहेत. शासन एकीकडे देत आणि दुसरीकडे घेत आहे. असा अनुभव येऊ लागला आहे. महागाई अशीच राहिली तर सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील होईल.निर्मला परिहार, गृहिणी