सोलापूर : पुढारी वृत्तसेवा
सध्याची जीवनशैली बदलली आहे. त्यामुळे संधिवाताचा धोका मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. सततची धावपळ, बैठे काम, व्यायामाचा अभाव आदींमुळे संधिवात वाढत आहे. पुरुषांपेक्षा महिलांमध्ये या आजाराचे प्रमाण अधिक आहे. अशा वेळेस वेळीच तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. औषधोपचाराने हा आजार बरा होऊ शकतो.
दरम्यान, दरवर्षी 12 ऑक्टोबरला जगभरात ‘जागतिक संधिवात दिवस’ साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश सांध्यांना होणार्या सांधेदुखीच्या आजाराबाबत लोकांमध्ये जागरुकता निर्माण करणे हा आहे. संधिवात म्हणजेच आर्थरायटिस एक किंवा अधिक सांध्यांना त्रास देतो. ज्यामुळे वेदना होतात आणि शरीराला सूज येते. जगभरातील अनेक लोक या समस्येने त्रस्त आहेत. वार्धक्य, साध्यांना पूर्वायुष्यात झालेली इजा, अतिश्रमामुळे झालेली झीज, बैठे काम आणि व्यायामाच्या अभाव, ‘ड’ जीवनसत्त्वे मिळू न शकल्याने हाडे ठिसूळ होतात.
शरीरातील सांध्यामध्ये दुखणे म्हणजे संधिवात होय. यातीलच आमवात हा एक प्रकार आहे.संधिवाताचे प्रमाण पुरुषांपेक्षाही महिलांमध्ये जास्त आढळून येते. कारण महिला खाली बसून कामे करतात. सध्या अनेकांना हा त्रास तिशीतच होत आहे. त्यामुळे महिलांनी आतापासूनच आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे.- डॉ. खलीककुझमा कादरी, संधीवात तज्ज्ञ