उत्तर सोलापूर : ऐन पाडव्याच्या दिवशी रात्री झालेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे पडसाळी (ता. उत्तर सोलापूर) येथील शेतकरी अंकुश सिरसट यांची तीन एकर द्राक्ष बाग भुईसपाट झाली आहे. त्यामुळे त्यांचे जवळपास 50 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
यंदाच्या वर्षी द्राक्षाला चांगले बाजारभाव मिळत आहेत. त्यामुळे पोटच्या पोराप्रमाणे शेतकऱ्यांनी द्राक्ष बागांचा सांभाळ केला आहे. मात्र ऐन सणासुदीच्या दिवशीच म्हणजेच शुभमुहूर्त मानल्या जाणाऱ्या पाडव्याच्या दिवशीच रात्रीच्या भयानक काळोखात वादळी वाऱ्यामुळे तीन एकर द्राक्ष बाग भुईसपाट झाल्याने त्या शेतकऱ्याच्या स्वप्नांचा पूर्णपणे चुराडा झाला आहे. एवढा मोठा आर्थिक फटका सहन होणे हे जिकरीचे होणार आहे.
गुरुवारी सायंकाळपासूनच रिमझिम पावसाला सुरुवात झाली होती. उत्तर सोलापूर तालुक्यातील पडसाळी, वांगी, रानमसले, कळमण, बीबी दारफळ, वडाळा, बाणेगाव, मार्डी या परिसरामध्ये अवकाळी पावसाने कहर केला. गुरुवारी (ता. १९) रात्री सव्वा अकराच्या सुमारास वादळ वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. जवळपास एक तास हा वादळी वाऱ्यासह पाऊस पडत होता. त्यामध्ये अंकुश सिरसट यांची तीन एकर द्राक्षबाग जमीनदोस्त झाली आहे.
बेदाणा रॅकचेही नुकसान
अंकुश सिरसट यांचा बेदाणा रॅकही आहे. त्या रॅकवरही जवळपास ६० ते ८० लाख रुपयांचा माल टाकलेला आहे. मात्र या अवकाळी पावसाने त्या बेदाणा रॅकवर असलेल्या मालाचे व बेदाणा रॅकचेही नुकसान झाले आहे.