सोलापूर ः अमोल साळुंके
दोन वर्षांनंतर राज्यात शिक्षक पात्रता परीक्षा होत आहे. या परीक्षेसाठी राज्यातील 3 लाख 53 हजार भावी शिक्षकांनी नोंदणी केली आहे. यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील 12 हजार जणांचा समावेश आहे.राज्यात नोव्हेंबर महिन्यात शिक्षक पात्रता परीक्षा घेतली जाणार आहे. गेल्या दोन ते तीन वर्षांमध्ये ही परीक्षा काही तांत्रिक कारणांमुळे आणि टीईटीच्या बोगस प्रमाणपत्रामुळे रखडली होती. पेपर क्रमांक एक - 1 ली ते 5 वी, पेपर क्रमांक दोन हे 6 वी ते 8 वी साठी घेण्यात येणार आहे. सन 2017 मध्ये शिक्षक भरती झाली होती. त्यानंतर आता 2023-24 मध्ये शिक्षक भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे नव्याने डी.एड बी.एड केलेल्या उमेदवारांना भावी गुरुजी होण्यासाठी आशा निर्माण झाली असल्याने त्यांना टीईटी परीक्षा उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे. त्यामुळे टीईटी परीक्षेसाठी मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.
टीईटी प्रमाणपत्रातील बोगसगिरीनंतर शासनाने पारदर्शक परीक्षेसाठी बाह्य यंत्रणांची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय प्रश्नपत्रिका तयार करणारी व ‘ओएमआर’ उत्तरपत्रिका बनविणारी संस्था यादेखील स्वतंत्र आहेत. त्यामुळे ही परीक्षा पारदर्शक होईल, असा विश्वास स्पर्धा परीक्षा राज्य उपाध्यक्ष प्रशांत शिरगुर यांनी व्यक्त केला आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या माध्यमातून 10 नोव्हेंबरला ‘टीईटी’ घेतली जाणार आहे. परीक्षेनंतर उत्तीर्ण विद्यार्थ्यांना निकालाची प्रमाणपत्रे आता परिषदेतर्फे नव्हे, तर स्वतंत्र गोपनीय संस्थेच्या माध्यमातून दिली जाणार आहेत.
‘टीईटी’च्या प्रत्येक परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे बंधनकारक केले आहेत. परीक्षेचे संपूर्ण रेकॉर्डिंग त्यामध्ये होईल, अशी व्यवस्था केली आहे. तसेच परीक्षा केंद्रांवरील प्रत्येक परीक्षार्थीची मेटल डिटेक्टरद्वारे तपासणी केली जाणार आहे.