भीमानगर : संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या उजनी धरणाची पातळी सोमवारी दुपारी 12 च्या सुमारास शंभर टक्के झाली. उजनीतून 1 लाख 25 हजार क्युसेक विसर्ग सोमवारी सायंकाळी 5 वाजता भीमा नदीमध्ये सोडण्यात आला. भीमा नदीने अक्राळविक्राळ रूप धारण केले असून बरेच पूल पाण्याखाली गेले आहेत.
गेल्यावर्षी 5 ऑगस्ट 2023 रोजी उजनी धरणात एकूण पाणीसाठा 66.94 टीएमसी, उपयुक्त पाणी साठा 3.28 टीएमसी होता, तर 6.12 टक्के धरण भरले होते. जुलै महिन्यात भीमा खोर्यात पडलेल्या मुसळधार पावसाने उजनी धरणात येणार्या विसर्गामध्ये मोठी वाढ होऊन वजा 30 टक्के असणारे धरण अधिक 50 टक्के झाले होते. पाच ते सहा दिवसांच्या विश्रांतीनंतर ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाच परत भीमा खोर्यात मुसळधार पावसाने थैमान घातल्याने उजनी धरणात मोठी आवक वाढल्याने अवघ्या चार दिवसात धरण शंभर टक्के भरले.
दौंडवरून उजनी धरणामध्ये 2 लाख 10 हजार क्यूसेक पाण्याची आवक होत असून सोमवारी सायंकाळी 5 वाजल्यापासून 1 लाख 25 हजार क्यूसेक विसर्ग भीमा नदीत होत असून यामध्ये अजून वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.