करमाळा: करमाळा शहरातील महात्मा गांधी विद्यालयातील इयत्ता दहावी मधील विद्यार्थिनी श्रावणी राहुल लिमकर हिचा सज्जनगडावर मृत्यू झाला आहे. रविवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास ही दुर्दैवी घटना सज्जनगड सातारा येथे घडले आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की श्रावणी लिमकर हिला हृदयाला छिद्र होते. तिला नेहमी धाप लागत असल्याने तिचे आई-वडील तिला सहलीला पाठवत नव्हते मात्र तिने मी सज्जनगड चढणार नाही व मला कास पठार पहायचे आहे अशी विनंती केली. व करमाळा येथील खाजगी शिकवणी घेत असलेल्या शहाणे क्लासेस मधील अकरा विद्यार्थी विद्यार्थिनी व शिक्षकांसह खाजगी वाहनाने सहलीला गेली होती.
सज्जनगड येथे गेल्यानंतर तिला गड चढण्यास शिक्षक व विद्यार्थ्यांनी विरोध केला असता तीने विरोधाला न जुमानता सज्जनगड चढून गडावर गेली. गडावर जाऊन तिने देवदर्शन घेतले तसेच आई-वडिलांनाही व्हिडिओ कॉल करून बातचीत केली. त्यानंतर तिला हृदयाचा त्रास सुरू झाला आणि तिला आलेल्या जोराच्या हृदयविकाराच्या झटक्याने तिचा गडावरच मृत्यू झाला.
सातारा येथील गडाच्या पायऱ्या चढून गेल्यानंतर तिला कसलाही त्रास जाणवला नाही. मात्र तिचा सज्जनगडावर आलेल्या हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. तिच्यावर आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. तिच्या पश्चात आई-वडील, आजी आजोबा, तीन बहिणी व एक भाऊ असा परिवार आहे. येथील गजराज तरुण मंडळाचे संचालक राहुल लिमकर यांची ती कन्या होती तिच्या अकस्मात मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.