पोखरापूर : पुढारी वृत्तसेवा : अनगर येथील अप्पर तहसील कार्यालय रद्द करण्याच्या मागणीसाठी माजी नगराध्यक्ष रमेश बारसकर यांच्या पुढाकारातून मोहोळ ते मुंबई असा ट्रॅक्टर, रिक्षा, बैलगाडी लॉग मोर्चाचे मंगळवारी (दि.३) आयोजन करण्यात आले होते. मात्र, पोलीस प्रशासनाने स्वराज्य हॉटेल समोरच लाँग मार्च रोखला. त्यानंतर महसूल प्रशासनाच्या वतीने आंदोलकांना पत्र देण्यात आले. त्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात आंदोलन थांबविण्यात आले. यावेळी मोहोळ तालुका बचाव संघर्ष समितीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. (Solapur News)
यावेळी आजी-माजी आमदारांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. मोहोळ शहरातून मुंबईकडे निघालेल्या मोर्चामध्ये ज्येष्ठ नेते दीपक गायकवाड, राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील, माजी नगराध्यक्ष रमेश बारसकर, काका देशमुख, सीमाताई पाटील, संजय क्षीरसागर, सत्यवान देशमुख, महेश देशमुख, सुशिल क्षीरसागर, विक्रम देशमुख, शिवरत्न गायकवाड, अतुल क्षीरसागर, अॅड. विनोद कांबळे, मंगेश पांढरे, अजय कुर्डे, संतोष सोलनकर, अशोक भोसले, सतीश काळे, तन्वीर शेख, जिब्राईल शेख, बिलाल शेख, दिलीप गायकवाड, किशोर पवार, संगिता पवार, राजाभाऊ अष्टुळ, नागेश खिलारे, विजय गायकवाड, जितेंद्र अष्टुळ, संतोष महानोर आदींसह मोहोळ तालुका बचाव संघर्ष समितीचे कार्यकर्ते व नागरिक ट्रॅक्टर, रिक्षा, बैलगाडीसह मोर्चामध्ये सहभागी झाले होते. (Solapur News)
दरम्यान, नायब तहसीलदार सुधाकर धाईंजे व पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांनी मोहोळ महसूल प्रशासनाकडून जिल्हाधिकाऱ्यांना पत्रव्यवहार करत मुख्यमंत्र्यांकडे बैठक लावण्यासंदर्भात विनंती केल्याचे पत्र देण्यात आले. यावेळी पोलिसांचा मोठा फौज फाटा ठेवण्यात आला होता.