Farmer Blocks Palkhi Route
केम: ऊपळवाटे-दहिवली मार्गे टेंभुर्णी जाणारा तसेच निवृत्तीनाथ महाराजांच्या परतीच्या पालखी सोहळ्याचा मार्ग असलेला सार्वजनिक रस्ता एका शेतकऱ्याने बंद केल्यामुळे केम परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून प्रश्न मार्गी न लावल्यास केम गाव बंद आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
केम गावठाण हद्दीतून जाणारा हा रस्ता अनेक वर्षांपासून सार्वजनिक वापरासाठी सुरू असून या मार्गावरून केम-टेंभुर्णी एसटी सेवा देखील सुरू होती. सध्या सावडी ते वेणेगाव या ७१ किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे HAM अंतर्गत काम सुरू असून हा मार्ग कोंढेज, निंभोरे, ऊपळवाटे, दहिवली मार्गे वेणेगाव-पंढरपूर रस्त्याला जोडण्यात आला आहे. मात्र केम येथील एका शेतकऱ्याने गावठाण हद्दीतील रस्त्यावर मोठे दगड टाकून मागील महिनाभरापासून वाहतूक पूर्णपणे बंद केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
या प्रकारामुळे केम-टेंभुर्णी एसटी सेवा बंद पडली असून सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, व्यापारी तसेच शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनींना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागत आहे. पर्यायी मार्ग उपलब्ध नसल्याने नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे.
विशेष म्हणजे निवृत्तीनाथ महाराजांची पालखी आषाढी वारीनंतर त्र्यंबकेश्वरकडे परतताना याच मार्गाचा वापर करते. आषाढी सोहळा अवघ्या दीड महिन्यावर येऊन ठेपला असताना रस्त्याचा प्रश्न अद्याप प्रलंबित असल्याने पालखी मार्गाबाबतही संभ्रम निर्माण झाला आहे. यामुळे परिसरातील वातावरण बिघडण्याची शक्यता व्यक्त केली जात असून प्रशासनाने तातडीने कारवाई करण्याची मागणी होत आहे.
दरम्यान, १४ मेरोजी रात्री केम गावाला पाणीपुरवठा करणारी ग्रामपंचायतीची मुख्य पाइपलाइन फोडण्यात आल्याची गंभीर घटना घडली. त्यामुळे ग्रामपंचायतीचे आर्थिक नुकसान झाले असून संपूर्ण गावाला पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.
या सर्व घटनांची गंभीर दखल घेऊन संबंधितांवर तातडीने फौजदारी गुन्हे दाखल करावेत, बंद करण्यात आलेला सार्वजनिक रस्ता त्वरित मोकळा करावा तसेच ग्रामपंचायतीची पाणीपुरवठा व्यवस्था सुरळीत करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. यासाठी केम ग्रामपंचायतीत ठरावही मंजूर करण्यात आला आहे.
तहसील प्रशासन, पोलीस प्रशासन, महसूल विभाग, भूमी अभिलेख विभाग, केम ग्रामपंचायत आणि पंचायत समितीने संयुक्तपणे हस्तक्षेप करून हा प्रश्न सोडवावा, अन्यथा, संपूर्ण केम गाव एक दिवस बंद ठेवून आंदोलन करण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. तसेच प्रशासनाने तातडीने निर्णय न घेतल्यास सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर येथे मोठ्या प्रमाणावर आंदोलन छेडण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.