सांगोला, पुढारी वृत्तसेवा : सरपंच पदाच्या निवडणुकीत मतदान केले नाही याचा राग मनात धरून चौघांनी उपसरपंचाला मारहाण केली. याबाबत उपसरपंच नानासो जालिंदर बंडगर (रा.महिम) यांनी चौघांविरुद्ध फिर्याद दिली आहे. ही घटना महिम येथील किराणा दुकानात घडली. तू गावात लई पुढारपण करतो, तुझ्यामुळे निवडणूकीत २० लाख रुपये पाण्यात गेले, असे म्हणत उपसरपंचाला शिवीगाळ दमदाटी करीत हाताने लाथा बुक्क्यांनी मारहाण केली व त्याच्या खिशातील ४ हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले, असे उपसरपंच जालिंदर बंडगर यांनी फिर्यादित म्हटले आहे.
विजय नारनवर , विकास कारंडे ,सचिन नारनवर व कुमार नारनवर (रा. कारंडेवाडी महिम ता. सांगोला) या चौघांविरोधात ही फिर्याद देण्यात आली आहे. फिर्यादी, नानासो जालिंदर बंडगर यांची मागील सहा महिन्यापूर्वी महिम ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदावर निवड झाली होती. तर अर्चना नारनवर ह्या सरपंच पदावर कार्यरत होत्या. दरम्यान त्यांनी सहा महिन्यात राजीनामा दिल्यानंतर २६ ऑगस्ट रोजी झालेल्या सरपंच पदाच्या निवडणुकीत अर्चना नारनवर यांचीच सरपंचपदी पुनश्च सरपंच निवड झाली होती.