सोलापूर: पुढारी वृत्तसेवा : सोलापूर जिल्ह्यातील भीमा नदी पात्रात विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाळूचा साठा निर्माण झाला आहे. त्यामुळे, ऐन पावसाळ्यात साठलेल्या वाळूमुळे नदीपात्रातील पाण्याचा प्रवाह बदलण्याची शक्यता असते. तसेच, यामुळे आसपासच्या गावात पूर येण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे जलसंपदा विभागाने सूचित केलेल्या ठिकाणचा वाळू उपसा करण्याची तयारी जिल्हा प्रशासनाने केली असून, लवकरच वाळू काढण्यात येणार आहे. शासनाच्या नव्या धोरणाप्रमाणे वाळू डेपो सुरू करण्यात येणार असल्याची माहिती प्रभारी जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी दिली. (Sand Pumping)
दिनांक 19 एप्रिल 2023 रोजी महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाने शासनामार्फत वाळू आणि रेतीचे उत्खनन, साठवणूक आणि ऑनलाईन प्रणालीद्वारे विक्री याबाबतचे सर्वंकष धोरण जाहीर केले आहे. या धोरणानुसार आपत्ती जनक परिस्थिती उद्भवू नये म्हणून ज्या ठिकाणी नदीपात्रामध्ये गाळाचे संचयन झाले आहे. अशा ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण होऊ नये, म्हणून जलसंपदा विभागाचे अभिप्राय व त्यांचे कडील प्रस्ताव प्राप्त करून घेऊन त्या ठिकाणी वाळू उत्खनन करण्याबाबतची तरतूद करण्यात आली आहे.
त्या अनुषंगाने सोलापूर जिल्ह्यातील भीमा नदीपात्राचा विचार करता नदीपात्रातील गाळाचे संचयन आहे. ज्या ठिकाणी पूर परिस्थिती उद्भवू शकते, अशा ठिकाणांबाबतची माहिती विचारण्यात आली होती. जलसंपदा विभागाकडील दिनांक 24 मे 2023 रोजीच्या पत्रानुसार, त्यांनी भीमा नदीवरील पाच ठिकाणे पूर परिस्थिती उद्भवू शकते, अशी ठिकाणे निवडली. या पाच ठिकाणाबाबत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीच्या बैठकीमध्ये चर्चा करून याबाबत निर्णय घेतला जाईल व पुढील तीन ते चार दिवसांच्या कालावधीमध्ये निविद्याची प्रक्रिया सुरू करता येऊ शकेल. त्यानंतर पुढील कार्यवाही होईल, अशी माहिती मा.ठोंबरे यांनी यावेळी दिली.
हेही वाचा