सोलापूर ः पुढारी वृत्तसेवा
राज्यात राष्ट्रीयीकृत बँका, सहकारी बँकांसह इतर बँकांतून आठ हजार 930 कोटी रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. यातून एक लाखांपेक्षा जास्त मराठा उद्योजक निर्माण झाले असल्याचे प्रतिपादन अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी केले.
लोकमंगल को-ऑप. बँक आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने हुतात्मा स्मृती मंदिर येथे शनिवारी (दि. 21) मराठा उद्योजक मेळावा व लाभार्थी सत्कार समारंभ झाला. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी आ. सुभाष देशमुख, सुधाकर महाराज इंगळे, शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे, दिलीप कोल्हे, दास शेळके, श्रीकांत डांगे, अनंत जाधव, राम जाधव, प्रमोद राऊत, योगेश वाघ उपस्थित होते. पाटील म्हणाले की, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून जिल्ह्यातील हजारो तरुणांना 808 कोटींचे कर्ज वाटप केले आहे. त्यामुळे जिल्ह्यात मराठा उद्योजक तयार झाले आहेत. त्या प्रत्येक उद्योजकांनी किमान दहा तरी उद्योजक बनवावेत. आ. देशमुख यांनी लोकमंगल बँकेच्या मदतीने एक हजार मराठा तरुणांना कर्ज देऊन उद्योजक बनविण्यासाठी सहकार्य केले. यापुढेही समाजातील तरुणांना मदत करावी, असे आवाहनही त्यांनी केले.
समाजातील तरुण उद्योजकांचे दर्शन घेण्यासाठी आलो आहे. मार्गदर्शन करण्यासाठी आलो नाही. नऊ महिन्यांपूर्वी नरेंद्र पाटील पुणे येथे भेटले होते. त्यावेळी त्यांनी तुम्ही एक हजार मराठा उद्योजक तयार करा, असे सांगितले होते. त्यानुसार एक हजार तरुणांना कर्ज देऊन उद्योजक बनविले आहे. आता 10 हजार तरुणांना उद्योजक बनविण्याचे उद्दिष्ट असल्याचे मत आ. देशमुख यांनी व्यक्त केले.
मराठा तरुणांची प्रतिमा वेगळी आहे. ती बदलण्यासाठी समाजातील तरुणांनी उद्योजक होऊन आपली प्रतिमा पुसावी. समाजातील तरुणांना उद्योजक बनविण्यासाठी आ. देशमुख यांनी हातभार लावला आहे. त्यांनी जिल्ह्यात बाराशेपेक्षा जास्त तरुणांना उद्योजक बनविल्याचे मत सुधाकर महाराज इंगळे यांनी व्यक्त केले.